Page

1 जुलै "महाराष्ट्र कृषी दिन"

                  कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्मदिन (१ जुलै) 'महाराष्ट्र कृषी दिन' म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती आणण्यामध्ये वसंतराव नाईक यांचा मोलाचा वाटा आहे, त्यामुळे त्यांच्या जन्मदिनी महाराष्ट्रात कृषी दिन साजरा केला जातो.

आजही महाराष्ट्रात शेतकर्‍यांची स्थिती बिकट आहे. देशाचा अन्नदाता असणार्‍या बळीराजावर बिकट संकट असल्याने अनेकजण आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. मात्र, आजच्या 'कृषी दिना'पासून प्रत्येकाने शेतकर्‍याप्रती आपलं असलेले सामाजिक भान लक्षात घेता बिकट काळात शेतकर्‍याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून त्यांना साथ देणं गरजेचे आहे.
राज्यातील तमाम शेतकऱ्यांना 'महाराष्ट्र कृषी दिना'च्या हार्दिक शुभेच्छा!

शुभेच्छुक :- श्री विठ्ठल पाटील खारकर 
कृषी मार्गदर्शक तथा संचालक
सुमेध ऍग्रो ट्रेडर्स, वरोरा 



महागांव: शेकडो शेतकरी तहसील व महावितरण कार्यालयावर धडकणार

सह्याद्री | चौफेर न्यूज 

महागांव : तालुक्यात मागील चार महिन्यात तीन ते चार पशुधन वाघाने फस्त केली. त्यामुळे कासारबेहळ, सेवानगर, वरोडी, वरोडी (जुनी), या गावातील शेतकरी शेतमजूर दहशतीत आले आहे.

सध्या पेरणी आटोपली पाऊस मात्र, दडून बसल्याने बळीराजा चिंतेत आहे. एकीकडे वाघाची दहशत तर दुसरीकडे निसर्ग कोपल्याने शेतकरी हतबल झाला आहे. पाण्याअभावी माल हातून जाईल असे बोलल्या जात आहे. 

वन विभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा व विज महावितरण कंपनीने शेतमालच्या जागली यासाठी सिंगल फेज किमान रात्री विद्युत पुरवठा करावा या मागणीसाठी दि.01 जुलै रोजी दुपारी 12 वाजता महागांव तहसील व विज महावितरण कंपनीच्या कार्यालयावर शेकडो शेतकरी धडकणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मस्के यांनी सांगितले.

उद्या शुक्रवारी कासारबेहळ, सेवानगर, वरोडी, वरोडी (जुनी), या परिसरातील शेतकरी बांधवानी आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरावे "अभी नही तो कभी" असेही, आवाहन प्रसिद्धी पत्रकातून करण्यात आले आहे. 

पावसाळ्यात वीजांपासून वाचण्यासाठी अशी करा तयारी

सह्याद्री | चौफेर न्यूज 

पावसाळ्यात अनेकदा मोठ्या प्रमाणात वादळ वारे व विजा पडत असतात. विशेषतः मान्सून काळात वीजा पडणे/वज्राघात होण्याच्या अनेक घटना घडत असतात. यामुळे मोठी मनुष्यहानी, पशुहानी होते त्याचबरोबर वित्त हानीसुद्धा मोठ्या प्रमाणात होते. शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होते. ही नैसर्गिक आपत्ती पूर्णपणे रोखू शकत नसलो तरी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून आपत्तीची हानीकारकता कमी करु शकतो. नागरिकांनी वज्राघात/विज पडल्यास कोणती काळजी घ्यावी व काय उपाययोजना कराव्यात, याबद्दल जाणून घेऊयात...

वज्राघात झाल्यास काय करावे व काय करू नये
सतर्कतेची/चेतावणी चिन्हे : अतिवेगवान वारे, अतिपर्जन्य आणि काळे ढग, घोंघावणारे गडगडाटी वादळ, जवळचे झंझावात, जास्त किंवा अधिक जास्त प्रमाणात मेघगर्जना.
वस्तुस्थिती:- वीज ही सामान्यपणे उंच वस्तूंवर पडते, कोणतेही स्थान हे पूर्णपणे सुरक्षित नाही परंतु, काही स्थाने इतर ठिकाणापेक्षा सुरक्षित आहेत, मोठी बांधकामे छोट्या किंवा खुल्या बांधकामांपेक्षा जास्त सुरक्षित असतात, जास्त पाऊस पडणाऱ्या क्षेत्राच्या बाहेरही वज्राघात होऊ शकतो (16 कि.मी.), वज्राघात सतत एकाच ठिकाणी होऊ शकतो, अशा परिस्थितीत सामान्यतः बाहेर पडलेल्या व्यक्तीच वज्राघातामुळे जखमी किंवा मृत्यू पावतात, वज्राघात बाधीत/जखमी व्यक्तीस तुम्ही मदत करू शकता. त्याच्या शरीरात कुठल्याही प्रकारचा विद्युत प्रवाह सुरु नसतो. त्या व्यक्तीस तात्काळ/त्वरीत मदत करावी.

काय करावे पूर्वतयारी

• वज्राघातापासून बचावासाठी भित्तीचित्रे / भित्तीपत्रके प्रदर्शित करा. आपल्या भागातील स्थानिक हवामानाविषयी अंदाजाची व सतर्कतेच्या माहितीचे निरीक्षण करा.

• स्वतःसाठी व कुटुंबासाठी वज्राघाताच्या आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सेवेसंदर्भात तसेच स्थानिक प्रशासकीय यंत्रणेसंदर्भात संपर्क करण्यासाठीचा आराखडा तयार करा.

• वैद्यकीय व स्थानिक आपात्कालीन सेवांचे संपर्क तपशील तयार करणे.

• आपत्कालीन साधने (Emergency Kit) तयार ठेवा.

• जर गडगडाटी वादळाचा/अतिवेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांचा अंदाज असेल तर घराबाहेर/घराबाहेरील क्रिया पुढे ढकलणे.

• वीजेवर चालणाऱ्या वस्तू, इलेक्ट्रीक व इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि वातानूकुलित यंत्रे बंद ठेवावे.

• आपल्या घराच्या आजूबाजूच्या वाळलेले झाडे किंवा मृत झाडे फांद्या काढून टाकणे.
तुमच्या परिसरात वादळी वारे वाहत असल्यास /विजा चमकत असल्यास
घरात असल्यास: घराच्या खिडक्या व दरवाजा बंद ठेवा, घराच्या दरवाजे, खिडक्या, कुंपणापासून दूर राहावे, मेघगर्जना झाल्यापासून 30 मिनिटे घराच्या आतच राहावे.

घराबाहेर असल्यास : त्वरित सुरक्षित निवाऱ्याच्या ठिकाणाकडे (मजबूत इमारतीकडे) प्रस्थान करावे, ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटरसायकल, सायकल यांच्यापासून दूर राहा. गाडी चालवत असल्यास, सुरक्षित स्थळी जाण्याचा प्रयत्न करा. गाडी सुरक्षित ठिकाणी लावताना मोठ्या झाडांपासून तसेच पुराचे पाणी येत असल्यास अशी ठिकाणे वगळून लावाव्यात. खुल्या ठिकाणांपेक्षा सामान्यतः खिडक्या बंद असलेल्या धातूपासून तयार झालेली वाहने (बस मोटार) चांगली आश्रयस्थळे होऊ शकता. उघड्यावर असल्यास, शेवटचा पर्याय म्हणून लगेच गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये झाकावे. जमिनीशी कमीत कमी संपर्क असावा. मोकळ्या तसेच लटकत्या विद्युत तारांपासून दूर रहा. जंगलामध्ये दाट, लहान झाडांखाली, उताराच्या जागेवर निवारा घ्यावा. इतर खुल्या जागेवर दरीसारख्या खोल जागेवर जाण्याचा प्रयत्न करा. (परंतु अचानक येणाऱ्या पूरापासून सावध राहा), जर जमिनीच्या वर पाणी आल्यास ताबडतोब सुरक्षित निवारा शोधून काढा.

वीज पडल्यास / वज्राघात झाल्यास: त्वरीत रुग्णवाहिका व वैद्यकीय मदत बोलवा. वज्राघात बाधित व्यक्तीस त्वरित वैद्यकीय मदत मिळवून द्या. त्याला हात लावण्यास धोका नाही. ओल्या व थंड परिस्थितीत, इजळाला (बाधित व्यक्ति) व जमिनीच्या मध्ये संरक्षणात्मक थर ठेवावा. जेणेकरून हायपोथरमीयाचा (hypothermiya / शरीराचे अति कमी तापमान) धोका कमी होईल.
इजा झालेल्या इसमास पुढीलप्रमाणे हाताळा:
 श्वसन बंद असल्यास:- तोंडावाटे पुनरुत्थान (Mouth-to-Mouth) प्रक्रिया अवलंबावी.

हृदयाचे ठोके बंद असल्यास:- कुठलीही वैद्यकीय मदत मिळेपर्यंत रुग्णाची हृदय गती सीपीआर (CPR) करुन सुरु ठेवा.

इजाळाची / रुग्णाचा श्वास व नाडी सुरु असल्यास - इतर दुखापतींसाठी/आघातांसाठी तपासणे (भाजणे/ऐकू न येणे/ न दिसणे).

काय करू नये
तयारी:- गडगडाटीचे वादळ आल्यास, उंच जागांवर, टेकडीवर, मोकळ्या जागांवर, समुद्र किनारी, स्वतंत्र झाडे, रेल्वे/ बस/सहलीची आश्रयस्थाने, दळणवळणाची टॉवर्स, ध्वजाचे खांब, विद्युत/ दिव्यांचे खांब, धातूचे कुंपण, उघडी वाहने आणि पाणी इत्यादी जागी जाणे, या जागांजवळ उभे राहणे टाळावे.

घरात असल्यास: वायरद्वारे जोडले गेलेले फोन/मोबाईल व इतर इलेक्ट्रिक/इलेक्ट्रॉनिक उपकरणे विद्युत जोडणीस लावू नये. (अशा आपत्कालीन वेळी कॉर्डलेस व वायरलेस फोनचा वापर करावा परंतु ते भिंतीला जोडलेले नसावे). गडगडीच्या वादळादरम्यान व वीजा चमकताना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करु नये. या दरम्यान आंघोळ करणे, हात धुणे, भांडी धुणे, कपडे धुणे, ही कार्य करु नयेत. काँक्रिटच्या (ठोस) जमिनीवर झोपू नये किंवा उभे राहू नये. प्रवाहकीय पृष्ठभागांशी संपर्क टाळावा (धातूची दारे, खिडक्यांची तावदाने, वायरिंग व प्लंबिंग/नळ).

घराबाहेर असल्यास: मेघगर्जनेच्या वेळी वीजा चमकत असताना किंवा वादळी वारे वाहत असताना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. वाहनांच्या धातू किंवा वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. अधांतरी लटकणाऱ्या / लोंबणाऱ्या केबल्स पासून लांब राहावे.

वज्राघात किंवा वीज पडणे ही नैसर्गिक आपत्ती आहे. ही नैसर्गिक आपत्ती कदाचित रोखली जावू शकत नाही, मात्र योग्य उपाययोजना करुन प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करून आपली व आपल्या संपत्तीची हानी होण्यापासून वाचू शकतो. मनुष्यहानी आणि वित्तहानी निश्चितच कमी केली जावू शकते किंवा पूर्णत: रोखलीही जाऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी नागरिकांनी पावसाळ्याच्या दिवसात प्रशासनाकडून जारी केल्या जाणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून आपत्तीशी सामना करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे.

- नंदकुमार ब. वाघमारे
माहिती अधिकारी जिल्हा माहिती कार्यालय, ठाणे

अग्नीपथ योजना रद्द करा - ऑल ईंडीया स्टुडंट फेडरेशन व ऑल ईंडीया युथ फेडरेशनची मागणी

चंदू राऊत | सह्याद्री चौफेर 

वणी : केंद्र सरकारच्या प्रस्तावित अग्निपथ योजनेविरोधात ऑल ईंडीया स्टुडंट फेडरेशन व ऑल ईंडीया युथ फेडरेशनच्या वतीने वणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बुधवारी (दि. २९) दुपारी निदर्शने करून निषेध व्यक्त केला.
 ‘अग्निपथ 'योजना मागे घ्या, व शहीद भगतसिंग रोजगार गॅरंटी कायदा (BNEGA) संसदेत पारीत करा, देशातील प्रत्येक बेरोजगारला रोजगाराची हमी द्या, या प्रमुख मागण्यांना घेऊन जाईंट लेफ्ट स्टुडन्ट,युथ संघटनांचा ऑल ईंडीया प्राेटेस्टचे आवाहनानुसार जोरदार शक्ति प्रदर्शनही करण्यात आले.
कॉ अनिल घाटे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केल्यानंतर उपविभागीय अधिकारी (SDO) यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी आंदोलनात राकेश खामनकर, सारंग घाटे, अथर्व निवडींग, शंकर केमेकर, अभय चरडे, पांडुरंग ठावरी, धनंजय आसुटकर, प्रफुल केमेकार आदींसह मोठ्या संख्येने विद्याथीॆ युवक सहभागी झाले होते.

शिरपूर : काल झालेल्या अपघातातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू

चंदू राऊत | सह्याद्री चौफेर

वणी : खाजगी कंपनीच्या कामानिमित्त चंद्रपूरला जात असतांना मोटारसायकलवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात वांजरी (मजरा) येथील 2 युवक गंभीर जखमी झाले. ही घटना काल 28 जून दुपारी घडली होती. त्यापैकी एका युवकाचा काल रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. गणेश वांढरे (25) असे या अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
काल (28 जून) रोज मंगळवारला दुपारी खाजगी कंपनीचे मार्केटिंग काम करणारा युवक व त्याचा मित्र वणीहुन घुग्गुस मार्गे चंद्रपूर ला मोटारसायकल ने जात असतांना बेलोरा फाट्याजवळ दुचाकी क्र (MH 29 BA 8705) अनियंत्रित होऊन दोघेही गंभीर जखमी झाले होते. शिरपूर पोलीस स्टेशन ला प्रत्यक्षदर्शीनी माहिती दिली. तर काही नागरिकांनी त्यांना तात्काळ चंद्रपूर येथे उपचारार्थ हलविण्यात आले होते. मात्र, यातील गणेश वांढरे याची प्रकृती चिंताजनक होती.
तालुक्यातील वांजरी येथील दोन युवक मोटरसायकलने चंद्रपूरला जात असतांना बेलोरा फाट्याजवळ त्यांच्या अपघात झाला. या अपघातात सचिन डोंगे (28) व गणेश वांढरे हे दोनही युवक गंभीर जखमी झाले होते. त्यांना तत्काळ चंद्रपूर येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले. गणेश या युवकाची प्रकृती चिंताजनक होती. काल रात्री त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे तर सचिन डोंगे याचे वर उपचार सुरु आहे असे समजते.

गणेश याच्या पश्चात आई व मोठा भाऊ असा आप्त परिवार आहे.

"रंगनाथ" च्या विजयानंतर शहरात एकच जल्लोष!

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

वणी : 26 जून रोजी श्री रंगनाथ स्वामी नागरी सह. पतसंस्थेची निवडणूक पार पडली. यात दोन गटात कमालीची चूरशी झाली. अनेकांना 35 टक्के मतदान झाल्याने विजयाची माळ कोणाच्या पत्यावर, अशी धाकधूक होती. मात्र मतदारांनी दहा बाय दहा व विस वर्षाची यशस्वी ही वाटचाल मनी बाळगून खातेदार, ठेवीदार सभासदांचे हित जोपासणाऱ्या नेतृत्वाकडे मतदारांचा कल झुकला, व जय सहकार पॅनलचा दणदणीत विजय झाला.
रंगनाथ स्वामी पतसंस्थेच्या निवडणुकीतील विजयाची माळ अॅड. देविदास काळे यांच्या गळ्यात पडली. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. शहरात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. ढोल पथकावर काळे समर्थक बेधुंद होऊन थिरकले. विजयी उमेदवारांची सजलेल्या वाहनातून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत राजकीय पक्षांचे नेतेही सहभागी झाले होते. 
विशेष म्हणजे, जय सहकार पॅनलच्या उमेदवारांनी संयमी प्रचार केला. अॅड. काळे यांचा पतसंस्थेच्या यशात असलेला महत्वाचा वाटा उमेदवारांच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा राहिला. आजवर या पतसंस्थेतील ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित राहिल्या. यापुढेही ही पतसंस्था सुरक्षित हातातच रहावी म्हणून मतदारांनी अॅड. देविदास काळे यांच्यावरच विश्वास दाखविला. असे विजयी उमेदवार अरविंद ठाकरे बोलताना सांगितले आहे. पतसंस्थेच्या निवडणुकीत भरगोस मतांनी दिल्याबद्दल माझे सर्व हितचिंतक, माझे सहकारी व मतदार राजाचे मनापासून जाहीरपणे आभार अरविंद ठाकरे यांच्या वतीने मानण्यात आले.
एकंदरीत मतदारांनी पतसंस्थेच्या यशस्वी वाटचालीचे मानकरी ठरलेल्या अॅड. काळे यांच्या नेतृत्वावरच पसंती असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. विजयानंतर जय सहकार पॅनलच्या समर्थकांचा एकच जल्लोष पाहायला मिळाला.

राजूर वासीयांचा 4 जुलै पासून बेमुदत 'रास्ता रोको'


चंदू राऊत | सह्याद्री चौफेर 

वणी : राजूर रेल्वे च्या जागेवर स्थापन झालेल्या विविध कोळसा कंपन्यांच्या कोळसा सायडिंग रहिवासी क्षेत्राला लागून गावात असल्याने प्रचंड प्रदूषण निर्माण होऊन गावातील जनतेला विविध आजारांना तोंड द्यावे लागत आहे. राजूर ग्रापं व प्र.नि. बोर्डाची परवानगी नसलेल्या ह्या अवैध कोळसा सायडिंग ला हटविण्यासाठी ग्रामवासीयांनी निवेदने व आंदोलन करूनही कोणतीही कारवाई न झाल्याने दि.4 जुलै 22 पासून राजूर रिंग रोडवर राजूर बचाव संघर्ष समितीचे बॅनर खाली बेमुदत रास्ता आंदोलन करण्यात येणार आहे.
राजूर परिसरात तांत्रिक दृष्ट्या गावाचा सीमेत येत नसले तरीही गावाला लागून असलेल्या कोळसा वॉशरीच्या कोळसा सायडिंग राजूर गावात असल्याने रात्रंदिवस सुरू असलेल्या कार्यामुळे प्रचंड प्रदूषण निर्माण होत आहे. प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या कुठल्याही नियमाला किंवा निकषाला पूर्ण न करता व परवानगी न घेता मनमानी पद्धतीने इथे कोळसा सायडिंग सुरू आहे. त्याच प्रमाणे ह्या कोळसा सायडिंगवर कोळसा आणण्यासाठी मोठ्या जड वाहनांच्या उपयोग केल्या जात असून राजूर रिंग रोड ज्याची क्षमता 15 ते 20 टनाची असताना 50 टन कोळशाची वाहतूक केल्या जात आहे. ह्या प्रकरणी राजूर वासीयांनी राजूर बचाव संघर्ष समिती समिती स्थापन करून संबंधित विभागाला निवेदने देऊन एक दिवशीय रास्ता रोको करण्यात आले होते. यावेळेस रेल्वे अधिकाऱ्यांनी प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या निकषाला पूर्ण करून स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घेण्यात येईल असे आश्वासन दिले व सात दिवसांच्या अवधी मागितला. 7 दिवस पूर्ण होऊनही कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही.  
याच दरम्यान, राजूर बचाव संघर्ष समितीने राजूर ग्रापं मध्ये निवेदन देऊन ग्रामसभा घेतली व त्यामध्ये गावातील प्रदूषणाला कारणीभूत कोळसा सायडिंग, कोळसाडेपो हद्दपार करण्याचा ठराव घेण्यात आला. तसेच कोळसा वॉशरी सुद्धा गावाच्या सीमेपासून दूर नेण्याचा ठराव पारित करण्यात आला. राजूर ग्रापं ने सुद्धा कोळसा सायडिंग व कोल डेपो बंद करण्याची नोटीस संबंधितांना बजावण्यात आली. या संदर्भात समिती सदस्यांनी मा. जिल्हाधिकारी यांची भेट मा. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे उपस्थितीत घेऊन प्रश्न मांडला. जिल्हाधिकारी साहेबांनी सर्वेक्षण करून कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले. परंतु त्यावर अजूनही काहीही झाले नाही. 
एवढे सगळे कमी आहे की काय, पुन्हा रेल्वे व वेकोली प्रशासन नव्याने कोळसा सायडिंग उभारण्यासाठी गावातील वस्तीला विस्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी रेल्वे व वेकोली प्रशासन गावकऱ्यांना नोटिसा बजावीत आहे. ह्या सर्व प्रकाराने गावात प्रचंड असंतोष पसरला असून गावकरी रेल्वे व वेकोली प्रशासनाचे दडपणाखाली आणि प्रदूषणाच्या छायेखाली जगत आहेत. गावकऱ्यांचे जीवन जगणे कठीण झाले आहे. करीता राजूर वासी राजूर बचाव संघर्ष समितीचे चे बॅनर खाली येथील अवैध कोळसा सायडिंग जोपर्यंत हटत नाही किंवा हद्दपार केल्या जात नाही तोपर्यंत दि. 4 जुलै पासून बेमुदत रास्ता रोको केल्या जाणार आहे.
या बाबतीत सूचना देणारे निवेदन मा. जिल्हाधिकारी यांना उपविभागीय अधिकारी वणी यांचे मार्फत दि. 28 जून रोजी राजूर बचाव संघर्ष समिती कडून देण्यात आले आहे. या वेळेस समितीचे माजी जि. प. सदस्य संघदीप भगत, डेविड पेरकावार, मो. अस्लम, कुमार मोहरमपुरी, सय्यद अशफाक, साजिद खान, अनिल डवरे, जयंत कोयरे, प्रवीण खानझोडे, मो. शरीफ, सावन पाटील, फिरदोस अली, आकाश हनुमंते, मो. खुसनुर आदी उपस्थित होते.

बंडखोर विरोधात संतप्त शिवसैनिकांचा जाहीर निषेध

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

वणी : शिवसेनेचे बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाचा मोठा गट फोडल्यानंतर शिवसैनिक कमालीचे संतप्त झाले आहेत. वणीमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बंडखोर संदीपान भुमरे व तानाजी सावंत, माजी मंत्री संजय राठोड, यांचे विरोधात संतप्त शिवसैनिकांनी जाहीर निषेध केला आहे.
जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी त्यांच्या विरोधात प्रचंड आक्रमक होऊन घोषणाबाजी करत राठोड यांचा निषेध करण्यात आला आहे.
आज 28 जून रोजी हजारों शिवसैनिक एकत्र येवून वणी येथील शिवतिर्थावर बंडखोर मंत्री व आमदार यांच्या विरोधात संतप्त निदर्शने आंदोलन करण्यात आले.
याप्रसंगी संजय देरकर, सुनील कातकडे, संजय निखाडे, दीपक कोकास, संजय आवारी, गणपत लेडांगे, शरद ठाकरे, महेश चौधरी, राजू तुराणकर, डॉ मस्की, प्रणिता घुगुल, डीमन टोंगे, यांच्या सह वणी विधानसभेतील पदाधिकारी व महिला आघाडी संघटिका उपस्थित होते. 

स्वातंत्र्य दिनानिमित्त ११ ते १७ ऑगस्ट पर्यंत “हर घर झेंडा” सप्ताह – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

नांदेड : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाची सांगता येत्या 15 ऑगस्ट रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक भारतीयांच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात, देशासाठी ज्यांनी बलिदान दिले त्यांचे स्मरण व्हावे, देशाप्रती भक्तीसह कृतज्ञतेची जाणीव वृद्धिंगत व्हावी या उद्देशाने 11 ते 17 ऑगस्ट हे सात दिवस संपूर्ण जिल्हाभर “हर घर झेंडा” हा विशेष उपक्रम राबविला जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. या विशेष उपक्रमासह भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हाती घेतलेल्या विविध उपक्रमांची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी व इतर कार्यालय प्रमुखांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभाग घेतला.

केंद्र शासनाच्या संस्कृती मंत्रालयाने “हर घर झेंडा” या उपक्रमाच्या आयोजनाबाबत विविध निर्देश दिलेले आहेत. यानुसार संपूर्ण जिल्हाभर प्रत्येक नागरिकांचा सहभाग घेऊन अधिकाधिक लोकसहभागातून हा उपक्रम राबविण्याचा मनोदय जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केला. या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी प्राधान्याने जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांनी त्यांच्या इमारतीवर व नागरिकांनी स्वत:च्या घरावर स्वयंस्फूर्तीने राष्ट्रध्वजाची उभारणी करण्याचे निर्देश दिले आहेत. याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस यंत्रणा, शाळा व महाविद्यालय, परिवहन, आरोग्य केंद्र, रास्तभाव धान्य दुकाने, सहकारी संस्था अशा सर्वसामान्य नागरिकांशी निगडीत यंत्रणांचा यात महत्वाचा सहभाग राहील.
भारतीय ध्वज संहिता 2002 भाग 1 मधील परिच्छद 1.2 मधील राष्ट्रध्वज हे हाताने कातलेल्या किंवा विणलेल्या लोकर / सूत / सिल्क / खादी कापडापासून बनविलेला असेल, असे नमूद केले होते. या तरतुदीमध्ये बदल करण्यात आला असून सदर बदलानुसार राष्ट्रध्वज हे हाताने कातलेल्या आणि हाताने विणलेल्या किंवा मशीनद्वारे तयार केलेल्या सूत / पॉलिस्टर / लोकर / सिल्क / खादी पासून बनविलेल्या कापडाचे असावेत, असा उल्लेख केला आहे. या बदललेल्या तरतुदीनुसार आता तयार करण्यात आलेल्या राष्ट्रध्वजाचा वापर या प्रयोजनासाठी करता येईल, असे केंद्रीय गृह विभाग यांच्या दिनांक 30 डिसेंबर 2021 रोजीच्या अधिसूचनेमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

हा अभिनव उपक्रम संपूर्ण जिल्हाभर यशस्वी व्हावा व प्रत्येक इच्छूक नागरिकांचा सहभाग यात नोंदविला जावा यादृष्टिने लवकरच स्वतंत्र ॲप विकसित करून त्यात प्रत्येकाला आपले नाव नोंदविता येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले. याचबरोबर या उपक्रमात भाग घेणाऱ्या प्रत्येकांना याचे छायाचित्रण, चित्रफित, ध्वनीमुद्रण आदी केंद्र शासनाच्या संस्कृति मंत्रालयाच्या amritmahotsav.nic.in या संकेतस्थळावर अपलोड करता येईल.
सदर उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि प्रत्येक ग्रामपंचायती यांचा महत्वपूर्ण सहभाग राहील. यासाठी ग्रामपंचायतीबाबत कृती आराखडा, जिल्ह्यातील सर्व आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपविभागीय रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, रास्तभाव दुकान, शाळा-महाविद्यालय, पोलीस, परिवहन सुविधा, मनपा, नगरपरिषद, नगरपंचायत या सर्व विभागाशी सुवर्णमध्य साधून अधिक लोकसहभागावर भर देण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी या बैठकीत दिले.

वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबीयांना पालकमंत्र्यांकडून सांत्वनपर शासकीय मदत


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

नागपूर : वीज पडून मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांना राज्याचे ऊर्जा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन सांत्वनपर शासकीय मदत दिली.
गेल्या काही दिवसात मान्सून पूर्व वादळ वाऱ्यामध्ये ग्रामीण भागात काही ठिकाणी वीज पडून शेतात काम करणारे मजूर मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा दोन दुर्घटनाग्रस्त कुटुंबांचे सांत्वन करण्यासाठी आज पालकमंत्र्यांनी जिल्ह्याच्या उमरेड तालुक्याला भेटी दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत आमदार राजू पारवे, जिल्हाधिकारी आर. विमला होत्या.
वीज पडून निधन झालेल्या इतवारीपेठ, उमरेड येथील दिवंगत उषा मांढळकर यांची कन्या दीपाली मांढळकर हिला ४ लाख रुपयांचा शासकीय मदतीचा धनादेश सुपूर्द केला. तर दुसऱ्या घटनेत शेतात काम करीत असताना वीज पडून मृत्युमुखी पडलेले मौजा हिवरा येथील शेतकरी दिवंगत भाऊरावजी वाढई यांच्या पत्नी रमाबाई वाढई यांना सांत्वनपर शासकीय मदत म्हणून ४ लाखांचा धनादेश सुपूर्द केला.

याप्रसंगी आमदार राजू पारवे, जिल्हाधिकारी श्रीमती आर. विमला उपस्थित होत्या.

चमत्कार अखेर घडलाच; जय सहकार पॅनलची विजयाची परंपरा कायम

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर

वणी : अवघ्या विदर्भासह वणी परिसराचे लक्ष लागून असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सह. पतसंस्थेच्या निवडणुकीचा निकाल समोर आला असून जय सहकारने आपल्या विजयाची परंपरा कायम ठेवली आहे. या निवडणुकीत सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांनी विजय मिळवला असून परिवर्तन पॅनलसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. या निवडणुकीत 'परिवर्तन'च्या सर्व उमेदवारांना दारूण पराभवाचा सामना करावा लागला आहे.
परिवर्तन पॅनलपुढे सतराही संचालकाच्या जागा जिंकण्याचे आव्हान असताना, जय सहकारने पुन्हा काँग्रेसच्या पाठिंब्याला तडाखा दिला आहे. कॉंग्रेससह परिवर्तन पॅनल ने पूर्ण ताकत लावून सुद्धा विरोधी पॅनल अॅड देविदास काळे यांच्या अचूक नियोजनामुळे अॅड ढवस यांना विजय मिळवता आला नाही. सहकार च्या अॅड देविदास काळे  यांनी मिळवलेला विजय अन्य साठी आत्मविश्वास वाढवणारा तर पाठिंबा दिलेल्याना आत्मपरीक्षण करण्यासाठी भाग पाडणारा आहे.
पतसंस्थेच्या या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांमध्ये अॅड देविदास काळे, विवेकानंद आबाराव मांडवकर, सुधीर जनार्दन दामले, हरीशंकर मन्साराम पांडे, लिंगारेड्डी मल्लारेड्डी अंडेलवार, अरविंद वसंतराव ठाकरे, परीक्षित अरुण एकरे, चिंतामण पांडुरंग आगलावे, गोपाळ रघुनाथ पिंपळशेंडे, पुरुषोत्तम हनुमंतू बद्दमवार, घनश्याम वासुदेव निखाडे, सुनील देवराव देठे, सौ छाया अशोक ठाकुरवार, सौ निम्माताई सुनील जीवने, रमेश केशव भोंगळे, सुरेश तानबाजी बरडे, व उदय सदाशिव रायपुरे यांचा समावेश आहे. 

लाचखोर सहायक अभियंता ६ हजार रुपयाची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात


कालू रामपुरे | सह्याद्री चौफेर 

वरोरा : डिमांड काढून देण्याच्या कामासाठी विद्युत वितरण कंपनी वरोरा, मधील सहायक अभियंता याला ६ हजार रुपयांची लाच घेताना चंद्रपूर लाचलुचपत विभागाने रंगेहाथ अटक केली. 

तक्रारदार हे वरोरा येथील रहिवासी असून सोलर सिस्टम फिटिंग व इलेक्ट्रिशियन चे कामे करतो, सोबतच ग्राहकांच्या घरी सोलर सिस्टम लावण्याचे काम करीत असून त्यासाठी डिमांड काढण्याच्या कामासाठी सहायक अभियंता श्रीणु बाबू चुक्का यांनी तक्रार कर्त्याला सहा हजार रुपयाची मागणी केली. तक्रारदार यांची पैसे देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याबाबत चंद्रपूर लाचलुचपत विभागाकडे रीतसर तक्रार केली. 
लाचलुचपत विभागाच्या पोलीस निरीक्षक शिल्पा भरडे यांनी प्रकरणाची पडताळणी करीत प्लॅन आखला व महावितरण कार्यालय वरोरा येथे आज २७ जून रोजी तक्रारदाराकडून सहायक अभियंता श्रीणु चुक्का हे सहा हजार रुपये घेत असतांना लाचलुचपत विभागाने रंगेहात अटक केली.
सदरची कार्यवाही ही राकेश ओला पोलीस उपायुक्त,पोलीस अधिक्षक ला.प्र.वि. नागपुर, मधुकर गिते, अप्पर पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि. नागपूर, तसेच पोलीस उपअधिक्षक, अविनाश भामरे, ला.प्र.वि. चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात पोनि शिल्पा भरडे, तसेच कार्यालयीन स्टॉफ नापोकॉ नरेश नन्नावरे, पो.अ. रविकुमार ढेंगळे, राकेश जांभुळकर, वैभव गाडगे व चालक सतिश सिडाम यांनी यशस्वी पार पाडली आहे.
पुढील तपास सुरू आहे.
यापुढे जनतेला कोणीही लाचखोर अधिकारी,कर्मचारी किवा त्यांचे वतीने कोणी खाजगी इसम लाचेची मागणी करीत असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

'युनिक मेडिकल फौंडेशन'च्या वतीने वारकऱ्यांना मोफत औषधोपचार

अतुल खोपटकर | सह्याद्री चौफेर 

पुणे : पंढरीच्या वारीत समाजसेवा करायच्या उदात्त आणि निस्वार्थी हेतूने 'युनिक मेडिकल फौंडेशन' जनवाडी-पुणे 16, गेली १५ वर्षे आपलं योगदान देत आली आहे.

पंढरीच्या वारीतील वारकऱ्यांना पुणे येथे गुरूवार दि २३ जून ला जनवाडी येथील विर बाजीप्रभू प्रशाला, दत्तवाडी येथील त्रिमूर्ती निवास व सासवड येथे शनिवार २५ जून ला संत सोपान काका समाधीमार्ग व जगताप बंधू यांच्या येथे पंढरीच्या वारकऱ्यांसाठी मोफत औषधोपचार करण्यात आला.
या वर्षी १६०० वारकऱ्यांनी याचा लाभ घेतला यात ८०० वारकऱ्यांना इंजेक्शन देण्यात आले तसेच पेन किलर मलमांचे वाटप करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. सागर लोखंडे, डॉ. राहुल लोखंडे, मानसी लोखंडे, श्री नारायण फणसे, डॉ. सुप्रिया लोखंडे आणि सर्व डॉक्टर टीम, दिलीप शिवाजीराव ढेरे, जाधवराव, वैशाली खंडागळे, पद्मा रमपुरे, संण्डे क्लबचे सुनील भांडवलकर टीम, सुभेदार मोहन शेलार, जयवंत कुंभार (आयुष मेडिकल), योगिता गिरीगोसावी (कुणाल मेडिकल) यांनी सहकार्य केले.

'रंगनाथ'ची निवडणूक पडली पार; केवळ 35 टक्के मतदान

सह्याद्री | चौफेर न्यूज 

वणी : श्री रंगनाथ स्वामी नागरी सह. पतसंस्थेची निवडणूक पार पडली. साधारणतः आठवडाभर नाट्यमय प्रचार, मूक सभा, भेटीगाठी चालू होते. आज 26 जूनला सकाळी 8 वाजेपासून ते 4 वाजेपर्यंत मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
नावाजलेल्या पतसंस्थेचे 36 हजार 187 सभासद मतदार असतांना केवळ 12 हजार 696 म्हणजेच 35 टक्केच झाल्याने दोन्ही पॅनलमध्ये धाकधूक वाढली आहे. 
शहरात "रंगनाथ" ची मुख्य शाखा असलेल्या 17 संचालक पदाची निवडणूक घेण्यात आली यावेळी दोन पॅनल रिंगणात आमने सामने उभे होते. विद्यमान अॅड देविदास काळे यांच्या नेतृत्वात जय सहकार पॅनल तर अॅड भास्कर ढवस यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन पॅनल चे उमेदवार उभे होते.
आज पार पडलेल्या निवडणुकीत संस्थेच्या 14 शाखेतील मतदानाच्या आकडेवारीत कमालीची घट झाल्याची माहिती समोर आले आहे. वणीत 10 हजार 183 एवढी सभासद संख्या असतांना फक्त 4 हजार 466 सभासदांनी मतदानाचा आपला हक्क बजावला आहे.
श्री रंगनाथ स्वामी नागरी सह.पतसंस्थेच्या 14 शाखेचे  झालेले मतदान 

वणी 10183 पैकी 4466, मारेगाव 2775 पैकी 1592, मुकुटबन 1481 पैकी 665, घाटंजी 2447 पैकी 1093, वरोरा 6148 पैकी 1078, गडचांदूर 2826 पैकी 620, चंद्रपूर 2105 पैकी 742, राजुरा 2219 पैकी 620, मूल 713 पैकी 217, भद्रावती 2551 पैकी 514, चिमूर 1217 पैकी 594, यवतमाळ 606 पैकी 116, आर्णी 301 पैकी 112, भ्रम्हपुरी 613 पैकी 275, एकूण 36187 पैकी 12696 इतके झाले.