Page

नात्याचं भावबंध सांगणारी मर्मस्पर्शी नाट्यकृती, 'क्षण..एक पुरे'


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

वणी : भावनिक गुंतागुंत, कौटुंबिक अडचणी, त्यात प्रेयसीचा हट्टीपणा या साऱ्या प्रश्नाभोवती फिरणारी 'क्षण..एक पुरे' ही मर्मस्पर्शी नाट्यकृती वणीच्या कलावंतांनी चंद्रपूर येथे सादर केली.
 
वैभवशाली सांस्कृतिक परंपरा लाभलेल्या वणीच्या कलावंतांनी नुकतेच राज्य हौशी नाट्य स्पर्धेत चंद्रपूर येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी नाट्यगृहात 'क्षण.. एक पुरे' हे दोन अंकी दर्जेदार नाटक सादर केले. लेखिका डा. माणिक वड्याळकर यांच्या सशक्त लेखणीतून साकारलेल्या या नाटकाची वणी येथील प्राचार्य हेमंत चौधरी यांनी निर्मिती केली. 
           
मोठया भावाच्या निधनानंतर वैधव्य आलेली वहिनी,तिची चिमुकली मुलगी,जर्जर म्हातारपण आलेले वडील यांची मोठी जबाबदारी खांद्यावर असलेला चाळीशी पार पडलेला नाना उर्फ जय. कौटुंबिक जबाबदारी मध्ये गुरफटत जाणाऱ्या जय ची प्रेयसी तृप्ती ही खूप हट्टी असते. ती जय कडे लग्नाचा तगादा लावते. आपल्यामुळे आपल्या मुलाचे लग्न होत नाही आहे हे समजुन-उमजून जय चे वडील प्राण त्यागतात.या सर्व दुःख विवनंचनात जय ला पक्षाघात होतो.अश्या मर्मस्पर्शी पटकथा मध्ये वणीच्या कलावंतांनी आपल्या कसदार अभिनयाने जीव ओतला. सर्व अभिनेत्यांनी रसिकांना अक्षरशः भुरळ घातली.
     
प्राचार्य हेमंत चौधरी हे आपल्या विनोदी भूमिके बद्दल सर्वपरिचित आहेत,मात्र या नाटकात त्यांनी आपली ही रूढ झालेली चाकोरी मोडीत काढली. नाना उर्फ जय या धीरगंभीर भूमिकेत त्यांनी आपली अभिनय प्रतिभा सिद्ध करीत सर्वांना चकित केले. विशेषतः वयाच्या ७२ व्या वर्षी अशोक सोनटक्के यांनी जय च्या वडिलांची आव्हानात्मक भूमिका आपल्या दमदार अभिनयाने लीलया पार पाडली.

दिग्दर्शक शुभम उगले यांच्या या नाट्यकृती मध्ये सौ.मीना गिरीश वानखेडे,उमाकांत म्हसे,प्रा.सौ सीमा किशोर सोनटक्के,कु.राधा किशोर सोनटक्के,स्वप्नील दहिवलकर यांनी उत्तम अभिनय करून आपापल्या भूमिकेला योग्य न्याय दिला.
कथेला साजेसं संगीत देण्याचे काम अजित खंदारे यांनी पार पाडले. प्रत्येक प्रसंगाला उठावदार व जिवंत करण्यासाठी केविद्रनाथ बारसागडे यांनी उत्तम प्रकाश योजना आखली. नेपथ्यकार निलेश कुंभारे यांचे रंगमंच उभारण्यात मोलाचे योगदान राहीले. अनिता अशोक सोनटक्के यांनी रंगमंच सजावट केली. वेशभूषा सौ.प्रणिता हेमंत चौधरी यांनी तर रंगभूषा वैभव अरुण चौधरी यांची होती. केशभूषा मनू गिरीश वानखेडे यांनी केली. अंजना उत्तम बहुउद्देशीय संस्था. चिखलगाव (वणी) तर्फे हे नाटक सादर करण्यात आले.

उल्लेखनीय म्हणजे वणीमध्ये एकेकाळी समृद्धशाली नाट्यपरंपरा होती. कालांतराने ती लोप पावत गेली. मात्र पुन्हा एकदा येथील रंगमंच चळवळीला नवीन उभारी देण्याचे काम प्राचार्य हेमंत चौधरी व त्यांची चमू करीत आहे, हे निश्चितच एक आशादायी चित्र आहे.

शिपाई संवर्गातील पदाेन्नतीसाठी उर्वरीत असलेली १५ टक्के पदभरती तातडीने करा - चंद्रपूर जिल्हा काेतवाल संघटनेचीे मागणी !

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : शिपाई संवर्गात पदाेन्नतीकरीता उर्वरीत असलेली १५ टक्के पदभरती तातडीने करा अश्या आशयाची मागणी महाराष्ट्र काेतवाल संघटना जिल्हा शाखेचे जिल्हाध्यक्ष प्रदिप मेश्राम, सचिव चिदानंद सिडाम, भूतपूर्व जिल्हाध्यक्ष उमेशकुमार अलाेणे, माजी राज्य संघटक प्रकाश चेपूरवार, कोषाध्यक्ष प्रशांत वाघमारे व अन्य पदाधिका-यांनी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांचे कडे आज सोमवार दि.२८ फेब्रुवारीला एका लेखी निवेदनातुन केली आहे.

दरम्यान काेतवाल संघटनेच्या एका शिष्टमंडळाने जिल्हाधिका-यां साेबत या रास्त मागणी संदर्भात चर्चा देखिल केली असल्याचे समजते. काेतवालांचे मानधनात वाढ करण्याबाबत शासन निर्णय क्र.बैठक २०१६ / प्र.क.५८१ / ई-१० दि. ६\२\१९ नुसार महसुल विभागांतर्गत असणा-या गट 'ड' च्या प्रथम नियुक्तीच्या पदापैकी नियमित पदांमधुन ४० टक्के काेतवालांसाठी राखीव ठेवण्यात यावीत,सेवा प्रवेश नियमांमध्ये आवश्यक ती सुधारणा करण्यांत यावे असे नमुद करण्यांत आलेले आहे. त्याच अनुषंगाने सन २०२१ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील काेतवाल संवर्गातुन शिपाई संवर्गात पदाेन्नती करतांना ४० टक्के ऐवजी २५ टक्क्यानुसार पदाेन्नती करण्यांत आली आहे. अजून १५ टक्के पदभरती शिल्लक आहे. विशेष म्हणजे शिपाई पदाची अनेक पदे चंद्रपूर जिल्ह्यात शिल्लक असल्याचे जिल्हा काेतवाल संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

याच संदर्भात एक निवेदन राज्याचे महसुल मंत्री बाळासाहेब थाेरात यांना पाठविण्यात आले असल्याचे काेतवाल जिल्हा संघटना अध्यक्ष प्रदिप मेश्राम यांनी आज या प्रतिनिधीशी बाेलतांना एका भेटीत सांगितले.

तालुक्यातील झोला येथे शिवसेना प्रणित युवासेनेच्या शाखेचे उद्घाटन, युवासेनेचा उपक्रम युवकांचे संघटन

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजल्याने शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी मोर्चेबांधणीला लागले असून पक्षीय बळ वाढविण्याकरिता गाव तेथे शाखा व घर तेथे शिवसैनिक हा उपक्रम शिवसेनेने हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत शिवसेना प्रणित युवासेनेने तालुक्यातील झोला या गावात युवासेनेची नवीन शाखा तयार केली असून नुकताच या शाखेचा उद्घाटन सोहळा पार पडला. युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांनी पदभार स्वीकारल्यापासून वेगवेगळे उपक्रम राबवून अनेक सामाजिक प्रश्न व समस्यांना वाचा फोडण्याचा यशस्वी प्रयत्न केला. पक्षांनी त्यांच्यावर टाकलेल्या जबाबदारीची जाणीव ठेऊन पदाला साजेशे कार्य करण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न राहिला आहे. आता त्यांनी पक्ष बांधणीला प्राधान्य देत, युवा वर्गाला संघटित करून गावांमध्ये युवासेनेच्या शाखा तयार करणे सुरु केले आहे. तालुक्यातील झोला येथे युवासेनेची कार्यकारणी गठीत करण्यात आली असून यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष संजय देरकर यांच्या हस्ते शाखा फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी सह उद्घाटक म्हणून युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे व संजय देठे उपस्थित होते. संजय देरकर यांनी रिबीन कापून झोला येथील युवासेनेच्या शाखेचे उद्घाटन केले. यावेळी गावातील अनेक युवकांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शाखा उद्घाटन सोहळ्याला शिवसेनेचे डॉ. जगन जुनगरी, भगवान मोहिते, प्रविण खानझोडे हे प्रामुख्याने उपस्थित होते. शिवसेना ते युवासेना पक्षबांधणीसाठी युवकांचे योगदान महत्वाचे असते, असे गौरव उद्गार यावेळी संजय देरकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला गावकऱ्यांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. युवासेनेच्या झोला शाखेचे शाखा प्रमुख म्हणून राजू मेश्राम यांची तर उपशाखा प्रमुख निलेश मूर्तिकार, सचिव अमोल सूर यांची निवड करण्यात आली. यावेळी उपस्थित शिवसेना व युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पक्ष बांधणीबद्दल महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. शाखा उद्घाटन सोहळ्याच्या यशस्वीतेकरिता रोहित घोडाम,लक्ष्मण घोडाम, हरी सुर, रवि मेश्राम, रोशन पढाल,गणेश मेश्राम,गजानन आत्राम,मंगेश आत्राम,पिंटू सुर,मिथुन मेश्राम,शुभम बावणे,मोहन ठाकरे,मयूर मूर्तिकर,आदित्य मूर्तिकर,देवानंद कनाके,गजानन कनाके,विजू रासेकर,शेखर मत्ते,दिनेश निंदेकर,सचिन मेश्राम,पिंटू तलांडे,सुरज मेश्राम,रुपेश मेश्राम,वैभव आंबेकर,अमोल बावणे यांनी सहकार्य केले.

तुटणाऱ्या लग्नाच्या मुकूटबन पोलिसांनी बांधल्या रेशीम गाठी


सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 

झरी : पोलीसाचे नाव येताच सर्व सामान्यांच्या मनात धडकी भरते. पोलिसांची प्रतिमा जनतेच्या मनात तितकीशी चांगली नाही. मात्र मुकूटबन पोलिसांचं सामाजिक रुप पाहायला मिळालं. जवळपास मोडलेलं लग्न पोलिसांनी परत जुळवून वधू वराच्या रेशीम गाठी बांधल्या. त्यामुळे मुकूटबन पोलिसांचे परिसरात कौतुक होत आहे. 

झरी जामणी तालुक्यातील लहान पांढरकवडा येथील बौध्द समाजाचे पंचफुलाबाई राजू आनंदराव वाळके यांची द्वितीय कन्या सपना व मारेगाव तालुक्यातील आकापुर येथील भावनाताई गौतम डेपुटी भरणे यांचे चिरंजीव प्रकाश या दोन्ही परिवारात दोन महिन्यांपूर्वी लग्नाचे नाते जुळले होते. काही पारिवारिक कारणांमुळे हे नाते तुटण्याच्या मार्गावर आले. त्यामुळे दोन्ही कुटुंबांत वितुष्ट निर्माण झाले. वडील हयात नाही मुलीच्या आईची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. लग्न मोडले तर मुलीचे काय होणार, या भीतीने त्यांची चिंता वाढली. त्यानंतर मुलीकडील आप्त संबंधातील माणसे घरी बैठक घेऊन बसले. यानंतर मुलीची आई पंचफुलाबाई, मुलगी सपना, सरपंच मधुकर राजूरकर, सामाजिक कार्यकर्ते नारायण गोडे, अनिल पावडे व नातेवाईक शनीवारी (ता. २६) मुकूटबन पोलीस ठाण्यात पोहोचले. 

सपनाची आई पंचफुलाबाई वाळके हिने आपली कैफियत ठाणेदार अजीत जाधव व पोलीस उप निरीक्षक अनिल सकवान यांचे समोर मांडली. कैफियत ऐकल्यानंतर ठाणेदार अजीत जाधव यांनी मारेगाव तालुक्यातील आकापुर येथील भरणे परिवाराला मुकूटबन ठाण्यात येण्यास सांगितले. हे दोन्ही परिवार एकत्र आल्यानंतर प्रकाश व त्यांच्या कुटुंबियाची ठाणेदार अजीत जाधव व पोलीस उप निरीक्षक अनिल सकवान यांनी दुपारी १२:०० ते ६:०० वाजेपर्यंत दोन्ही परिवाराचे समुपदेशन करून समजूत काढली. अखेर नवरदेव प्रकाश व भरणे परिवार तयार झाले. दुसरे दिवशी विवाहाचा विधी उरकण्याची तयारी सुरू झाली. या कार्यास लागणारा सर्व खर्च मुलामुलींना कपडे, मंगळसूत्र, जोडवे, हारतुरे, मिठाई व अल्पोपहारचा खर्च वाळके परिवार कडून करण्यात आला. शेवटी दोन्ही पक्षाच्या वऱ्हाडीच्या साक्षीने रविवारी संध्याकाळी ७:३० वाजता लहान पांढरकवडा येथे वधू मुक्कामी मंडपात विवाह सोहळा पार पडला. 

बौध्द समाजाचे रितिरिवाज प्रमाणे मंगलाष्टके झाली, फुलांच्या अक्षता पडल्या, दोघांनी एकमेकांच्या गळ्यात माळ टाकली. हा अविस्मरणीय प्रसंग मुकूटबन पोलिस ठाण्याचे ठाणेदार अजीत जाधव व पोलीस उप निरीक्षक अनिल सकवान यांच्या समुपदेशन ने पार पडला. पोलीस उप निरीक्षक अनिल सकवान, पोलिस कर्मचारी मंगेश सलाम, दिलीप जाधव, संदीप बोरकर, संजय खांडेकर, संदीप कुमरे, सरपंच मधुकर राजूरकर, सामाजिक कार्यकर्ते नारायण गोडे, व दोन्ही पक्षाकडील वऱ्हाडांच्या साक्षीने वधू-वर लग्नाच्या पवित्र बंधनात अडकले.

वणी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनसोबत माजी आमदार प्रा.राजुभाऊ तोडसाम यांनी साधला संवाद


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

वणी : वणी येथे काल दि.२७  ला सायंकाळी विदर्भातील जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आदीवासी सेल चे प्रदेशाध्यक्ष मा.आमदार प्रा.राजुभाऊ तोडसाम यांनी वणी येथील कार्यकर्त्यांची विश्राम गृहामध्ये भेट घेतली.

राष्ट्रवादी काँग्रेस च्या नवीन पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना काम कसे करायचे आहे यांची रुपरेषा समजावुन सांगीतली. पक्षाचा कार्यकर्त्यांनी फक्त लोकांपर्यंत जाऊन त्यांची अडचणी समजुन घ्या आणि त्या लोकांचे काम पुर्ण करुन द्या, तेच लोक तुम्हाला मोठे करणार आहे, मोठे असलेल्या लोका पेक्षा सर्व सामान्य लोकांना पदे द्या, जबाबदारी घ्यायची व पक्षाच्या धोरणात्मक संघटन बांधणीकडे जास्तीत जास्त लक्ष घाला व येणा-या निवडणुकी मध्ये राष्ट्रवादी पुर्ण ताकदीने मैदानात उतरणार आणि नगर पालिका, जिल्हा परिषद साठी आपण सर्वानी आतापासून कंबर कसायची आहे, प्रत्येक सामान्य कार्यकर्त्यांना मोठे करा, पक्षाकडुन पाहीजे ती मदत आपणास मिळणार असल्याचे माजी आमदार राजू तोडसाम यांनी विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत बोलताना सांगीतले. काम करत असतांना काही अडचण आली तर मी आपल्या सोबत आहे, तसेच जिल्ह्याचे नेते, मा.संदीप भाऊ बाजोरीया साहेब, आमदार नाईक साहेब, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील आहे. आणि काम करणा-या कार्यकर्त्यांसोबत पक्ष खंबीरपणे उभा रहाणार अशी ग्वाही प्रा.तोडसाम यांनी दिली.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हा सरचिटणीस स्वप्नील धुर्वे यांनी वणी विभागातील काही मुद्यांवर चर्चा केली. त्यांचासोबत महेश पिदुरकर, कपील कुंटलवार, अक्षय चन्ने, हेमंत गावंडे युवक तालुकाध्यक्ष, मनोज वाकटी शहराध्यक्ष युवक, रामकृष्ण वैद्य, इमदास पकाले, वैशाली तायडे, संदेश तिखट, प्रणय बल्की, सचीन चव्हाण, रानु तुमराम, हार्दिक उरकुंडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

सिंदोला माईन्स येथे लसीकरण मोहीम राबवून ४० चिमुकल्यांचे केले पोलियो लसीकरण

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : पोलियो या शारीरिक अपंगत्व निर्माण करणाऱ्या आजाराची लक्षणे मुलांमध्ये उद्भवू नये व या आजाराची मुलांना लागण होऊ नये म्हणून शासनाकडून आरोग्य विभागांतर्गत पोलियो लसीकरण मोहीम मागील अनेक वर्षांपासून राबविली जात आहे.

काल २७ फेब्रुवारीला या पोलियो लसीकरण मोहिमेंतर्गत तालुक्यातील ए.सी.सी. सिंदोला माईन्स येथील ऑक्युपेशनल हेल्थ सेंटर येथे पोलियो लसीकरण शिबीर घेऊन ३५ ते ४० चिमुकल्यांना पोलियोचे डोज देण्यात आले. सिंदोला माईन्स, हनुमान नगर व येणक या गावातील जनतेने या शिबराचा लाभ घेऊन आपल्या मुलांना पोलियोचे लसीकरण करवून घेतले. पोलियो लसीकरणाबाबत विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येत असली तरी स्थानिक पातळीवर आरोग्य विभागाकडून आरोग्य सेवक व सेविकांमार्फत गावागावात लसीकरण मोहीम राबवावी लागते. लसीकरणाकरिता नागरिकांना प्रोत्साहित करावे लागते. एस.सी.सी. सिंदोला माईन्स येथे ऑक्युपेशनल हेल्थ सेंटरच्या माध्यमातून पोलियो लसीकरण मोहीम राबविण्यात आली. हेल्थ सर्विसच्या जी.डी.एम. डॉ. अपर्णा झवेरी व ए.सी.सी. सिमेंटचे जनरल मॅनेजर सुरेश वांढरे यांच्या मार्गदर्शनात ही पोलियो लसीकरण मोहीम राबविण्यात आली.

या लसीकरण मोहिमेच्या यशस्वीतेकरिता अंगणवाडी सेविका सुनिता पाटिल, आशा सेविका निशा रामटेके, मदतनीस दुर्गा गेडाम, ओ.एच.सी. एसीसी स्टाफ नर्स मंदा चंदनखेडे, ओ.एच.सी. फार्मासिस्ट वैभव उपाध्ये आदींनी परिश्रम घेतले.

शालेय विद्यार्थ्यांना सवलत द्या - अखिल भारतीय संविधानिक हक्क परिषदची मागणी

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

वणी : खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याकरिता आकारण्यात येणाऱ्या प्रवास शुल्कात पन्नास टक्के घट करावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी संविधानिक हक्क परिषद ने वाहतूक विभागाकडे निवेदनातून केली आहे.

कोरोना मुळे शाळा-कॉलेज बंद होते. आता मात्र, शाळा सुरु झाल्याने विद्यार्थी शाळा व ट्युशन क्लासेस करिता ग्रामीण भागातून शहरात येरजाऱ्या करतात. मात्र, फायदा घेऊन खासगी प्रवासी चालक त्यांच्याकडून अतिरिक्त तिकिटाचे दर वसुल करीत आहे.

त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक फटका बसत असून यात सवलत देण्यात यावी अशी मागणी संतोष आत्राम, काजल मेश्राम, खुशबू तेलतुंबडे, स्टेलीन घोष, प्रगती कडू, जया राजूरकर, साक्षी श्रीवास्तव, अंजु चव्हाण व विद्यार्थ्यांनी केली आहे.

संताजी ब्रिगेडचे काम वाखाण्याजाेगे व काैतुकास्पद - संगिताताई तलमले

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

नागपूर : उपराजधानी नागपूरातील संताजी ब्रिगेड तेली महासभाचे काम उल्लेखनिय व वाखाण्याजाेगे असल्याचे मत ए.आय.सी.सी. नॅशनल काे - ऑर्डीनेटर प्रदेशच्या कार्यकारी अध्यक्षा संगिताताई तलमले यांनी व्यक्त केले.

संस्थेचे संस्थापक व सचिव अजय धाेपटे यांनी अथक परिश्रम घेवून त्यांनी या संस्थेला पुढे नेण्याचा आटाेकाट प्रयत्न केला ताे खराेखरचं अभिनंदनिय काैतुकास्पद असल्याच्या त्या पुढे म्हणाल्या. नागपूरातील जवाहर विध्यार्थी गृहात काल शनिवार दि.२६ फेब्रुवारीला आयोजित केलेल्या भव्य महिला मेळावा तथा विनामुल्य आराेग्य शिबिर उद्घाटनाच्या निमित्ताने त्या बाेलत हाेत्या. या वेळी उपस्थित महिलांना संगिताताई तलमले यांनी माेलाचे मार्गदर्शन केले. सदरहु आयाेजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रमेशजी गिरडे यांनी विभूषित केले हाेते. याच कार्यक्रमाच्या निमित्ताने वेळी एका पथनाट्याचे आयोजन करण्यात आले हाेते. पार पडलेल्या या पथनाट्यातील कलावंताची अनेकांनी प्रशंसा केली. या वेळी एका रक्तदान शिबीर व आरोग्य शिबीराचे आयोजन देखिल करण्यात आले हाेते. अनेकांनी या शिबिराचा लाभ घेतला असल्याचे आयाेजकानी आमच्या प्रतिनिधीशी बाेलतांना सांगितले.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पूर्व नागपूरचे आमदार कृष्णाजी खापर्डे, माजी महापाैर शेखर सावरबांधे, कामठीचे आमदार राधेश्याम हटवार, मनपा नागपूरच्या उपमहापाैर मनिषाताई धावडे, कन्हान नगर परिषदेच्या नगराध्यक्षा करुणा आष्टनकर, पारशिवणी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा प्रतिभा कुंभलकर मंगला गवरे, कल्पनाताई कुंभलकर ,रेखा साकोरे, वंदना भुरे, समिता चकोले, अभिरुची राजगिरे, वंदना चांदेकर, जयश्री वाडीभस्मे, कुसुम बावनकर, शिला कामडे नंदा लोहबरे, मनपा माजी नगरसेविका नयना झाडे, प्रामुख्याने उपस्थित हाेत्या. कार्यक्रमाचे संचालन चित्रा माकडे यांनी केले. संताजी ब्रिगेड तेली समाज महासभाच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अजय धाेपटे, विजय हटवार, हितेश बावणकुळे, रुपेश तेलमासरे, गजानन तळवेकर, मंगेश साखरकर, कुमार बावणकर, आदींनी अथक परिश्रम घेतले.

आयोजित उपराेक्त कार्यक्रमाला महिला व तरुणींची उपस्थिती लक्षणिय हाेती.

स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळतांना निर्माण होऊ लागल्या आहेत अनेक अडचणी


सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे

वणी : गरीब लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानातून धान्य खरेदी करतांना मोठ्या अडचणी येऊ लागल्या आहेत. रेशनकार्ड धारकांना धान्य खरेदी करण्याकरिता स्वस्त धान्य दुकानाच्या चकरा माराव्या लागत असल्याने ते कमालीचे वैतागले आहेत. कधी धान्य उपलब्ध नसते, तर कधी तांत्रिक बिघाड व सरवर डाऊन राहत असल्याने लाभार्थ्यांना आल्यापावली परत फिरावे लागत आहे. धान्य मिळण्याचा कोणताही ठरलेला कालावधी नसल्याने मजुरी बुडवून दूर वरून धान्य मिळण्याच्या आशेने येणारे मजुरही धान्याच्या उप्लब्धतेअभावी हताश होऊन परत जातात. बहुतांश स्वस्त धान्य दुकाने राहुटी वस्त्यांपासून २ ते ३ किमी अंतरावर असल्याने लाभार्थ्यांना धान्याच्या किमती पेक्षा घरापर्यंत धान्य नेण्याचा खर्च जास्त उचलावा लागत आहे. धान्य मिळण्याचा वेळ व काळ निश्चित नसल्याने मजूरवर्ग स्वस्त धान्य दुकानाच्या चकरा मारून थकतो, व नंतर धान्य मिळण्यापासूनच वंचित रहातो. मोफत धान्य मिळण्याचाही कालावधी निश्चित नसल्याने कित्येकांना अनाजा पासून वंचित रहावे लागले. रेशनकार्डवर मिळणाऱ्या धान्यावर अनेक गरीब गरजू लोकांची उपजीविका चालते. स्वस्त धान्य दुकानातून मिळणारे धान्य हे गरिबांच्या जगण्याचा आधार असतांना त्यांना याच धान्यापासून वंचित रहावे लागत असल्याने त्यांच्या समोर मोठ्या अडचणी निर्माण होऊ लागल्या आहे. धान्य खरेदी ऑन लाईन झाल्याने ग्राहकांचे ईपीओएस मशीनवर फिंगर मॅच झाल्यानंतरच त्यांना अनाज मिळते. परंतु नेटवर्कच्या समस्येमुळे व तांत्रिक अडचणींमुळे ही मशीन काम करत नसल्याने लाभार्थ्यांना धान्य प्राप्त करतांना मोठा त्रास सहन करावा लागत असून तासंतास रांगेत ताटकळत उभे रहावे लागत आहे. मागील काही दिवसांपासून स्वस्त धान्य दुकानातील ई-पास मशीन सातत्याने बंद पडत आहेत. या ई-पास मशीन टूजी नेटवर्कच्या असल्याने नेटवर्कच्या समस्येमुळे या मशीन काम करीत नाही. त्यामुळे मशीनवर नागरिकांचे थंब घेणे शक्य होत नसल्याने लाभार्थ्यांना ई-पास मशीन ऍक्टिव्ह होईस्तोर धान्य मिळत नाही. परिणामी त्यांना स्वस्त धान्य दुकानाच्या चकरा माराव्या लागत असल्याने त्यांचा मोठा मनस्ताप होत आहे. मागील काही दिवसांपासून सातत्याने सर्व्हर डाऊन रहात असल्याने रेशकार्ड धारकांना स्वस्त धान्य दुकानांची नुसती पायपीट करावी लागत आहे. फेब्रुवारी महिना हा २८ दिवसांचाच असल्याने व सातत्याने ई-पास मशीन बंदची समस्या उद्भवल्याने लाभार्थ्यांना अनाज खरेदी करिता काही दिवस वाढवून मिळतील काय, हा प्रश्न आता नागरिकांमधून विचारला जाऊ लागला आहे. सर्व्हर डाऊनमुळे दुपारी ३ वाजतानंतर धान्य वाटपाला सुरुवात होत असल्याने बऱ्याचशा लाभार्थ्यांना अद्याप धान्य मिळालेले नाही. उद्याची शेवटची तारीख असल्याने अनेक लाभार्थी धान्य मिळण्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ई-पास मशीन बंदची समस्या दूर होई पर्यंत रेशनकार्ड धारकांना धान्य खरेदी करण्याकरिता समोर काही दिवस वाढवून देणे गरजेचे झाले आहे.

आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते पुलाचे भूमिपूजन संपन्न


सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 

झरी : यवतमाळ जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या तेजापूर येथे शनिवारी (ता. २६) ला विविध भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमापूर्वी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार त्यांचे गावातील मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.

तेजापूर ते निंबाळा व देऊरवाडा या गावाला जाण्यासाठी नागरिकांना सोयीचे व्हावे त्यासाठी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार स्थानिक फंडातून पुलांचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य मंगलाताई पावडे, माजी सभापती लीलाताई विधाते, दिनकर पाटील पावडे, सरपंच चंद्रभागा सहारे, आशु पानघाटे, गजानन मालेकर, आशिष मालेकार , भैयाजी भोयर, आशिष उमाटे, सचिन झाडे, मधुकर धांडे, कानोबा झाडे, गणेश काकडे ,छगन मालेकर, अमोल सहारे, व इतर गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, गावकरी मोठ्या संख्येने हजर होते.

स्काऊट गाइड कडून पोलिओ लसीकरणला मदत

सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 

झरी : हिंदुस्थान स्काऊट आणि गाइड च्या वतीने पोलिओ लसीकरण मोहीमेला यवतमाळ जिल्ह्यातील मुकुटबन येथे रोव्हर अँड रेंजर च्या समूहाने आरोग्य केंद्र मुकूटबन येथे कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे मदत केली.

हिंदुस्थान स्काऊट गाइड चे जिल्हा सचिव नितीन मनवर, गाइड ऋतुजा देवाळकर, गाइड स्नेहा जेट्टीवार, गाइड संजीवनी जंगमवार, गाइड वैष्णवी चेलपेलवार, गाइड दिशा केळझरकर, गाइड श्रद्धा बेंद्रे, स्काऊट गौरव निब्रड, महेश टेकाम यांनी यांनी सेवा दिली.

यावेळी वैद्यकीय अधिकारी अरविंद वानखेडे, डॉ. जीवन कुडमेथे, नर्स भावना भेतफुलावर, आशा वर्कर शोभा मेश्राम, राधा लिकेवार, शोभा गड्डेवार, संतोष उमरे, स्वप्नील कडुकर हे होते. तर महाराष्ट्र अध्यक्ष नरसिंगजी मेंगजी तथा महाराष्ट्र सचिव गोपालराव डोंगरे यांच्या मार्गदर्शनात सहकार्य करून सेवा देण्यात आली.

वणी आगार येथे मराठी भाषा गौरव दीन साजरा करण्यात आला


सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : वणी आगार येथे आज २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा दिवस असल्याने वणी आगार व्यवस्थापक सुमेध टिपले यांनी जेष्ट पत्रकार रमेश तांबे यांच्या हस्ते फित कापूस आगारात लावलेल्या बोर्डचे उद्घाटन केले.यावेळी वाहतूक निरीक्षक वसंत टेकाम, सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक के.व्हि.सावळे, वाहतूक नियंत्रक एस.टी.शेरकी, वाहतूक नियंत्रक कपीले, बाबाराव कुळमेथे,व इतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सर्व प्रवाशांना मराठी भाषा दिनानिमित्त माहिती देण्यात आली.तसेच प्रवाशांना साखर, पेढे वाटून मराठी भाषा दिनानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.

अवैध रेती उपसा करणारा ट्रॅक्टर वनविभागाने केला जप्त

सह्याद्री न्यूज | रवि घुमे 

मारेगाव : वनविभागाच्या हद्दीत येत असलेल्या नाल्यातून अवैधपणे रेतीचा उपसा करणारा ट्रॅक्टर केगाव बीट वनरक्षकांनी पकडला. ही कारवाई बारा वाजताच्या दरम्यान करण्यात आली.

मारेगाव तालुक्यातील वेगाव परिसरातील वनविभागाच्या हद्दीतील नाल्यामधुन अवैधरीत्या रेतीचे उत्खनन करून ट्रॅक्टर वेगाव मार्गाने येत असल्याचे वन विभागाने गोपनीय माहिती च्या आधारे एम एच २९ ए डी ८२१६ या क्रमांकाचे ट्रॅक्टर, ट्रॉली आज (ता.२७) व चालक अमोल राजुरकर रा. डोंगरगाव तसेच मालक पवन जांभुळकर रा. वेगाव यांच्या मालकीहक्काचा ट्रॅक्टरमध्ये भरलेली लाल रंगाची रेती व उत्खननाची साधने वनविभागाने ताब्यात घेवून मारेगाव वनपरिक्षेत्र कार्यालयात जमा केले आहेत.

वनपरिक्षेत्र अधिकारी विक्रांत खाडे, वनपाल अशोक पोयाम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केगाव बीट वनरक्षक प्रेमिला सिडाम यांनी केली आहे.


चंद्रपूर महसुल पथकाची धडक कारवाई

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : चंद्रपूरचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राेहन घुगे तसेच चंद्रपूरचे तहसीलदार निलेश गाैंड यांचे मार्गदर्शनाखाली आज रविवार दि.२७ फेब्रुवारीला भल्या सकाळी गुप्त माहितीच्या आधारे चंद्रपूर शहर लगतच्या दुर्गापूर पदमापूर मार्गावर अवैध रेतीचे वाहन मंडळ अधिकारी रमेश आवारी, महिला तलाठी प्रतिभा येरमे व रजनी मडावी यांनी पकडल्याचे वृत्त आहे. गेल्या काही दिवसांपासून रेती माफियांनी अवैध रित्या महसुल पथकाची नजर चुकवून दिवस रात्र वाहनाव्दारे रेती चाेरुन नेण्याचा सपाटा लावला हाेता.या बाबतीत आता महसुल विभागाने चांगलीच कंबर कसली असून जिल्हाभर महसुल पथक आपल्या जिवाची पर्वा न करता अवैध गाैण खनिज वाहने पकडत आहे. दरम्यान, महसुल पथकातील महिला पटवारी देखिल आता अश्या रेती तस्कारांवर कारवाया करण्यास व त्यांची अवैध गाैण खनिजाची वाहने पकडण्यास महत्वाची भूमिका पार पाडत असल्याचे एकंदरीत दिसून येते. आजच्या या महसूल पथकाच्या कारवाईमुळे या परिसरातील रेती माफियांचे अक्षरशा धाबे दणाणले आहे. सदरहु वाहन पकडल्याची माहिती लगेच प्रतिभा येरमे यांनी भ्रमनध्वनी तहसीलदार गाैंड यांना दिली असल्याचे समजते.महसुल पथकाच्या जाळ्यात अडकलेल्या अवैध रेती वाहनाचा जप्तीनामा मंडळ अधिकारी रमेश आवारी यांनी घटनास्थळी केला असून ते वाहन दंडात्मक कारवाईसाठी चंद्रपूर तहसील कार्यालयात जमा केले आहे.

या आधी काेरपना भागात महिला तलाठी रोशनी काेल्हे यांनी मंडळ अधिकारी राजेन्द्र पचारे यांचे मार्गदर्शनाखाली अवैध गाैण खनिजाचे वाहन पकडले असल्याचे सर्वश्रूतच आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्र जिबगाव अंतर्गत उपकेंद्र सावली येथे जि.प.सदस्य मनिषाताई चिमुरकर यांच्या हस्ते पोलिओ डोस पाजुन उद्घाटन संपन्न


सह्याद्री न्यूज | उमेश गोलेपल्लीवार

सावली : प्राथमिक आरोग्य केंद्र जिबगाव अंतर्गत उपकेंद्र सावली येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णकल्याण समिती अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य मनिषाताई चिमुरकर यांच्या हस्ते पोलिओ डोस पाजुन उद्घाटन करण्यात आले.‌त्यावेळी उपस्थित प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णकल्याण समिती अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य चंद्रपूर. आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.गोबाडे सर डाॅ.देवगडे सर आरोग्य साहा.आवळे सर ठिकरे सर.आंगनवाडी कार्यकर्ते व मदतनीस उपस्थित होते.

विद्युत प्रवाह बंद असलेल्या वीज खांबांना कापून चोरट्यांनी जर्मनची विजेची तार केली लंपास

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : तालुक्यात चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून चोरटे नजरेस पडेल त्या वस्तू व साहित्य लंपास करू लागले आहेत. घर, दुकानात चोरी करण्याबरोबरच कंपन्यांमधीलही लोखंडाचे साहित्य चोरी करण्याचा डाव आखतांनाच मालवाहू वाहनांच्या स्पेअर पार्टसचीही हे चोरटे चोरी करू लागले आहेत. आता या चोरट्यांनी विद्युत विभागाच्या वीज प्रवाह बंद असलेल्या विजेच्या खांबांना लक्ष करून खांबावरील जर्मनची विजेची तार लंपास करण्यापर्यंत मजल मारली आहे. तालुक्यातील गणेशपूर येथील शेत शिवारातील विद्युत डीपी असलेल्या विजेच्या खांबावरील ६६ केव्ही वीज पुरवठा करणारी जर्मनची तार चोरट्यांनी चोरून नेली. तसेच लोखंडी वीज खांब कापून त्याचे १४ तुकडे केले. शासकीय मालमत्तेवरही आता चोरट्यांचा डोळा असल्याचे पाहायला मिळत आहे. बंद अवस्थेतील विद्युत उपकरणेही आता चोरट्यांच्या रडारवर आली आहेत. विजेच्या पोलचे नुकसान व वीज तार चोरून नेल्या प्रकरणी लाईनमनने पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. 

गणेशपूर शेत शिवारातील वीज प्रवाह बंद असलेल्या व विद्युत डीपी बसवून असलेल्या वीज खांबाला लक्ष करून चोरट्यांनी ०.१ स्क्वेयर मिली मीटरची जर्मनची विजेची तार चोरून नेली. ६६ केव्ही वीज प्रवाह क्षमता असलेली विजेच्या खांबावरील ही जर्मनची तार १ किमी लांब व २८० किलो वजनाची होती. लोखंडी वीज खांबाचेही या चोरट्यांनी कटरने कापून १४ तुकडे केले. विजेचे खांब कापले गेल्याने विद्युत विभागाचे ५ हजार रुपयांचे नुकसान झाले असून २० हजार रुपये किमतीची जर्मनची विजेची तार चोरट्यांनी चोरून नेली. लाईनमनच्या ही बाब वेळीच लक्षात आल्याने इतर विजेची उपकरणे चोरी जाण्यापासून वाचली. वीज खांबावरील या डीपीचा विद्युत प्रवाह बंद असून वीज प्रवाह बंद असलेल्या विद्युत तारा व लोखंडी खांबांना चोरट्यांनी लक्ष करणे सुरु केले आहे. याबाबत महापारेषण उपविभाग यवतमाळचे लाईनमन सुनिल वसंतराव राऊत (४५) यांनी पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंवि च्या कलम ३७९, ४२७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार श्याम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहे.

अवैध गाैण खनिजावर दंडात्मक कारवाया करण्यासाठी मंडळ अधिकारी राजेन्द्र पचारे, प्रकाश सुर्वे व रमेश आवारींनी कसली कंबर!


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर: जिल्ह्यात प्रशासनाच्या वतीने काही रेती घाटाचे लिलाव झाले तर काही घाटाचे लिलाव अद्यापही हाेणे शिल्लक आहे.प्रशासनाचे वतीने जिल्ह्याच्या ब-याच भागात महसुल विभागाचे फिरते पथक कार्यरत आहे. या शिवाय जिल्हा खनिकर्म विभागाची टीम गुप्त माहितीच्या आधारे जिव धाेक्यात टाकून दिवस रात्र अवैध वाहनांवर कारवाया करीत असल्याचे दिसुन येते.

जिल्ह्याभरात एवढ्या माेठ्या प्रमाणात कारवाया सुरु असतांना देखिल रेती तस्कर रात्रीचा फायदा घेत व महसुल विभागाच्या पथकाची नजर चुकवून हिंमतीने वाहनाव्दारे अवैध रेती आणित असल्याचे दिसून येते.काही भागात रेती तस्करांनी पथकावर व अधिका-यावर पाळत ठेवण्यासाठी राेजंदारीच्या व्यक्तिंची नेमणूक केली असल्याचे बाेलल्या जाते.परंतु त्यांनी किती ही रेती चाेरी साठी प्रयत्न जरी चालविले असले असले तरी जिल्ह्याच्या काेरपना भागातील मंडळ अधिकारी राजेन्द्र पचारे, गाेंडपिपरीचे मंडळ अधिकारी प्रकाश सुर्वे, घुग्घुसचे मंडळ अधिकारी किशाेर नवले, पडाेलीचे मंडळ अधिकारी विनाेद गणफाडे, राजूराचे मंडळ अधिकारी निरंजन गाेरे, जिल्हा खनिकर्म विभागातील अल्का खेडकर यांनी अवैध रेती तस्करांच्या वाहनांना पकडुन चांगलाच धडा शिकविला आहे तर चंद्रपूरचे मंडळ अधिकारी रमेश आवारी यांनी गुप्त माहितीच्या आधारे महसुल पथकास साेबत घेवून अवैध रेती माफियांच्या मुसक्या आवळण्याचे काम जाेरात सुरु केले आहे.

दरम्यान दि.२४ फेब्रुवारीला जुनाेना मार्गावरुन अवैध रेतीची वाहतुक करतांना एका वाहनास मंडळ अधिकारी आवारी, तलाठी संदेश सरपे, पिल्लई व येरमे यांनी पकडले.त्यांनी ही संयुक्तिकरित्या कारवाई करीत त्या वाहनाचा जप्ती नामा केला व त्या वाहनांस दंडात्मक कारवाईसाठी तहसील कार्यालयात जमा केल्याचे व्रूत्त आहे. सध्याच्या परिस्थितीत पठाणपुरा व वढा हे अवैध रेती तस्करांचे केन्द्र बनले असल्याचे बाोलल्या जाते या कडे संबंधित मंडळ अधिका-यांनी व त्यांचे महसुल पथकांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाया कराव्या अशी जनतेंकडुन सातत्याने मागणी हाेत आहे. विशेषता खनिकर्म विभागाने या कडे जातीने लक्ष पुरविल्यास अनेक रेती तस्करांचे (अवैध गाैण) वाहने जाळ्यात अडकु शकते परिणामे शासनाला माेठ्या प्रमाणात दंडात्मक कारवायापाेटी महसुल मिळू शकते. जिल्ह्यात अवैध गाैण खनिज प्रकरणात काेरपनाचे मंडळ अधिकारी राजेन्द्र पचारे, प्रकाश सुर्वे यांनी जिवाची पर्वा न करता दिवस रात्र पथकास साेबत घेवून अवैध गाैण प्रकरणात ब-याच कारवाया केल्या आहे तर गडचांदुर हे औद्योगिक परिसर असून देखिल या ठिकाणी मंडळ अधिकारी नारायण चव्हाण यांचे कारवाया फारच अल्प असल्याचे कळते. अनेक मंडळ अधिकारी व त्यांचे पथक अवैध गाैण खनिज वाहने पकडण्यांसाठी खासगी वाहनांचा उपयाेग करीत असतात परंतु त्यांना शासनाकडुन त्या वाहनांचा किराया मिळत नसल्याची खंत जिल्ह्यातील अनेक मंडळ अधिका-यांनी बाेलून दाखवली.

शासनाचे वाहने वापरल्यास रेती तस्करांचे अवैध गाैण खनिज वाहने मिळत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या कडे प्रशासनाने लक्ष देणे तेव्हढेच महत्वाचे व गरजेचे आहे.खराेखरचं जिल्हा प्रशासन त्यांचे या मागणीकडे लक्ष पुरवेल काय ?

महाशिवरात्रि निमित्त निघालेल्या.पालखीचे सावली शहरात भव्य स्वागत.


सह्याद्री न्यूज | उमेश गोलेपल्लीवार 

सावली : श्री पुण्य भुमी तिर्थक्षेत्र श्री मुर्केंडेश्वर देवस्थान पंचकमेटी देवटोक (सिर्सी) येथून महाशिवरात्रि च्या पर्वावर दि 23 फेब्रुवारी पासुन पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर सावली तालुक्यातील अनेक गावांना दर्शन देत सदर पालखीचा समापन सोहळा देवटोक येथे होणार आहे, याचाच एक भाग म्हणून देवटोक येथून निघालेल्या शिव पालखीचे सावली नगराच्या स्मशानभूमी परिसरातील योगी संत नारायण बाबा मठात भव्य स्वागत करण्यात आले.

यावेळी संत मुर्लीधर स्वामी महाराज, हरणघाट, यांच्या प्रमुख उपस्थितीत, नरेंद्र जक्कलुवार सचिव,नामदेव हजारे कोषाध्यक्ष,भास्कर पोहनकर,राकेश गोलेपल्लीवार ग्रा. प. सदस्य, पत्रुजी चुदरी उपाध्यक्ष, गजानन पाल (सेवक) सुधीर महाराज, निलकंठ फाले पुजारी, सोबतच सामाजिक कार्यकर्ता नितीन भाऊ गड्डमवार, अंकुश भाऊ शेंडे,सावली लोकमत दुधे (पत्रकार) बाबा मेश्राम (पत्रकार) प्रकाश लोनबले (पत्रकार )तसेच कार्यकर्ते संजय गेडाम, सोमा मोटघरे, सतीश भाऊ कोतपल्लीवार, कवी पुल्लीवार, वासुदेव मोहूर्लै, सुनिल नापे, मोरेश्वर मंगर, अलोक पोशेट्टीवार, शम कोहपरे, मंगल पिटारे, आदी मान्यवर उपस्थित होते.
   
कोरोना च्या काळात गेली दोन ते तीन वर्षापासून बंद असलेले मंदिर, यात्रा,मज्जीद, जत्रा, सोबत लग्न कार्यक्रम व सामाजिक कार्यक्रम यावर कोरोनाची तिसरी लाट थंडावल्यानंतर काहीसे निर्बंध हटवण्यात आले त्यामुळे अनेक सामाजिक, धार्मिक कार्याना सुरुवात झाली , यातच विदर्भाची काशी समजल्या जाणाऱ्या चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा देवस्थान हे विदर्भातील भाविकांचे श्रध्दास्थान आहे,त्यामुळे विदर्भासह अनेक जिल्ह्यातील भाविक तसेच परप्रांतीय भावीक यात्रे दरम्यान येत असतात, मात्र मार्कंडा यात्रेच्या पूर्वी सावली तालुक्यातील देवटोक(सिर्सी ) येथे मोठी जत्रा भरण्याचे.महत्त्व आहे असे जुने जाणकार सांगतात. त्यांमुळे देवटोक मंदीर परीसराचे महत्त्व लक्षात घेता परम पुज्य संत कार्तीक स्वामी महाराज यांचे परमशिष्य ,हरणघाट हनुमान मंदीराचे.उद्धारकर्ते परम पुज्य.संत बाबा मुर्लीधर स्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली महाशिवरात्रि च्या पर्वावर शिव पालखीचे आयोजन करण्यात आले.

सदर पालखीची सुरुवात देवटक येथून सुरुवात झाली असून तालुक्यातील सावली ,जिबगाव, बोथली,किसान नगर, कापसी ,उपरी ,सामदा पाथरी व्याहाळ आदी गांवाना.दर्शन देत.हर.हर महादेव या शिवशंभु चा जयघोष करत.पालखीचा समापन सोहळा देवटोक(सिर्सी) येथे दि 1,2 मार्च.2022 ला प.पु मुर्लीधर स्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली होत.आहे , त्याचाच एक.भाग म्हणून सदर.पालखीचे उत्साहात स्वागत सावली नगरातील जागृत संत.श्री.योगी नारायण बाबा मठात भव्य स्वागत करण्यात आले.

शहरांपासून दूर मटका चालविणाऱ्याला पोलिसांनी केली अटक

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : शहरात कुठेही मटका खेळला जाणार नाही, याची पोलिसांकडून पूर्णतः खबरदारी घेतली जात असतांनाही काही मटका बहाद्दर शहरापासून दूर निर्जनस्थळी लपून छपून मटका चालवत असल्याने पोलिसही हैराण झाले आहेत. अशाच एका शहरापासून दूर लपून छपून मटका चालवणाऱ्या आरोपीला पोलिसांनी काल सायंकाळी ४.४० वाजताच्या सुमारास लालगुडा चौपाटी परिसरातून अटक केली आहे. बसस्टँड मागे मटका चालवणाऱ्या या आरोपीला मटका पट्टी फाडतांना पोलिसांनी रंगेहाथ अटक केली. अवैध धंद्यांवर कडक निर्बंध लावण्यात आले असतांना, व पोलिस अवैध धंद्यांवर बारीक लक्ष ठेऊन असतांना देखील मटक्याचा खेळ चालवणारे विविध शकली लढवून मटका चालवत असल्याने पोलिसांचीही डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. अवैध धंद्यांना पायबंद लावण्याकरिता पोलिस दिवसरात्र शहरात गस्त घालत आहे. अवैध धंद्यांची पाळेमुळे खणून काढण्याकरिता शहरात पोलिसांची शुद्ध मोहीम सुरु असतांना लालगुडा चौपाटी येथे मटका सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. लालगुडा चौपाटी परिसरातील बसस्टँड मागे मटका खेळवला जात असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी त्याठिकाणी धाड टाकली असता काही इसम तेथे मटका खेळतांना आढळून आले. पोलिस आल्याचा सुगावा लागताच मटका खेळणारे सुसाट पळाले. तर मटका चालवणारा पोलिसांच्या हाती लागला. मटका जुगारावर पैशाचा खेळ खेळवतांना पोलिसांनी आरोपीला रंगेहाथ अटक केली. फारुख कदीर शेख (२४) रा. शास्त्रीनगर असे या मटका पट्टी फाडतांना अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. मटक्याचा खेळ पूर्णतः बंद ठेवण्याच्या पोलिसांच्या आव्हानानंतरही काही मटका बहाद्दर मटका चालविण्याचे धाडस करीत असल्याने पोलिसही त्यांना चांगलीच अद्दल घडवू लागले आहेत. लपून छपून मटका चालवितांना अटक केलेल्यांची आता पोलिस स्टेशनमध्ये चांगलीच खातिरदारी केली जात आहे. पोलिसांच्या सूचनेनंतरही मटका खेळवणाऱ्यांकडून आव्हानात्मक भूमिका घेतली जात असल्याने पोलिसांनीही आता बाजीराव दाखवणे सुरु केले आहे. हातावर फटक्यांचा प्रसाद देऊन अवैध धंद्यांपासून तौबा करण्याची शिकवण पोलिसांनी देणे सुरु केले आहे. मटक्यावर टाकलेल्या धाडीत पोलिसांनी अँड्रोईड मोबाइलसह ८७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीवर मजुका च्या कलम १२ (अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

आश्रमशाळा माथार्जुन येथे चाळीस आदिवासी विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र वाटप

सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 

झरी : आश्रमशाळा माथार्जुन येथे ४० आदिवासी विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. मा प्रकल्प अधिकारी यांच्या पुढाकाराने प्रकल्पातील सर्व आश्रमशाळेवर एकाच दिवशी आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत जात प्रमाणपत्र वाटप करण्याचा निर्धार मा प्रकल्प अधिकारी श्री विवेक जॉन्सन यांनी व्यक्त केला होता,त्या अनुषंगाने आश्रमशाळा माथार्जुन येथील मुख्याध्यापक,शिक्षक यानि पालकांशी संपर्क साधून,घरोघरी जाऊन आवश्यक प्रमाणपत्र गोळा करून जवळपास ४० प्रस्ताव दाखल केले आणि अगदी ३ ते ४ दिवसात जात प्रमाणपत्रे तयार झालित यासाठी झरी तहसील चे तहसीलदार यांनी कर्मचाऱ्यांना विशेष आदेश देऊन अगदी कमी कालावधीत काम पूर्ण करून घेतले,विशेष म्हणजे पालकांना कोणत्याही प्रकारचे शुल्क पालकांना भरावे लागले नाही, झेरॉक्स (xerox) सुद्धा आश्रम शाळेकडूनच काढून दिल्या गेल्या अत्यंत कमी कालावधीत पूर्णपणे मोफत जात प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांना मिळाली याबद्दल पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून याचे परिसरात विशेष कौतुक होत आहे.

या साठी प्रभारी मुख्याध्यापक श्री सोनोने,शिक्षक श्री नागोसे,क्रीडाशिक्षक श्री साजिद सर,संगणक शिक्षक श्री भिवरकर ,शिपाई श्री मारोती सीदाम चोकीदार महेश परचाके यांनी विशेष मेहनत घेतली.

उपराजधानी नागपूरात आज संताजी ब्रिगेड तेली महासभाच्या वतीने भव्य महिला मेळावा व रक्तदान शिबिराचे आयाेजन

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

नागपूर : नागपूरातील संताजी ब्रिगेड तेली महासभा वतीने शनिवार दि. २६फेब्रुवारीला दुपारी १ वाजता स्थानिक जवाहर विध्यार्थी गृहात भव्य (नंदनवन पाण्याच्या टाकीजवळ) महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

ह्या मेळाव्याच्या निमित्ताने पथनाट्य, रक्तदान शिबीर व आरोग्य शिबीराचे देखिल आयोजन करण्यात आले आहे. सदरहु मेळाव्याचे उद्घाटन ए.आय.सी.सी.नँशनल काे.- ऑर्डीनेटर प्रदेशच्या कार्यकारी अध्यक्षा (आेबीसी) संगिताताई तलमले यांचे शुभ हस्ते हाेत आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रमेशजी गिरडे हे विभूषित करणार आहे. तर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री तथा वि.प.आमदार चंद्रशेखर बावणकुळे, पूर्व नागपूरचे आमदार क्रूष्णाजी खापर्डे, वि.प. आमदार अभिजीत वंजारी, माजी महापाैर शेखर सावरबांधे, कामठीचे आमदार टेकचंदजी साखरकर, उद्याेजक व समाजसेवक राकेश भावळकर उपस्थित राहणार असल्याची माहिती संताजी ब्रिगेड तेली महासभा संस्थापक व सचिव अजय धाेपटे यांनी काल नागपुर मुक्कामी दिली.

उपराेक्त कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजय हटवार, सहसचिव हितेश बावनकुळे, कोषाध्यक्ष रुपेश तेलमासरे, गजानन तळवेकर, मंगेश साखरकर, कुमार बावनकर आदीं अथक परिश्रम घेत आहे.

महाराष्ट्र ट्रायबल आघाडीने घेतली साहित्यिक विचारवंत बाबाराव मडावी यांची सदिच्छा भेट

सह्याद्री न्यूज नेटवर्क | कुमार अमोल 

यवतमाळ : साहित्यीक व सामाजिक विचारवंत मा बाबाराव मडावी यांची महाराष्ट्र ट्रायबल आघाडीचे राज्य अध्यक्ष गित घोष यांनी भेट घेतली.

या प्रसंगी आदिवासीचे राजकारण व समाजकारण या संबधी चर्चा करण्यात आली. सर्व सामान्य माणसाच्या मनात आदिवासीचे सक्रिय आणि अस्तित्व निर्माण करणाऱ्या राजकारणाची नितांत आवश्यकता असल्याचे दिसत आहे. ही जबाबदारी पेलण्यासाठी वैचारिक विचा-याच्या निस्वार्थी कार्यकर्त्यांची फळी निर्माण होण्याची गरज आहे. व तशी वाटचाल करावी लागेल अशी रविवार झालेल्या भेटी दरम्यान सविस्तर चर्चा झाली.

यावेळी जिल्हाध्यक्ष राजूभाऊ चांदेकर यांच्या नेतृत्वात राज्य उपाध्यक्ष महाराष्ट्र ट्रायबल आघाडी एड संतोष भादीकर, श्री वसंतराव कनाके, श्री संतोष चांदेकर, श्री नरेश गेडाम, महेश आत्राम, यांच्यासाह अन्य महाराष्ट्र ट्रायबल आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. 

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित


सह्याद्री न्यूज | रवि घुमे 

यवतमाळ : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आणि २९ व्या वर्धापन दिनानिमित्त इंडो मंगोलियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री या दोन आंतरराष्ट्रीय संस्थेच्या वतीने द पिल्लर ऑफ हिंदुस्थानी सोसायटी २०२१-२०२२ या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हा सन्मान सोहळा ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे सचिव डॉ. संजय भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. २४ फेब्रुवारी २०२२ रोजी ओल्ड रॉयल मुंबई याच क्लब गेटवे ऑफ इंडियाच्या समोर, मुंबई येथे पार पडला.

या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून मेजर जनरल श्री शिशिर महाजन, एच ई ॲम्बासॅडर श्री वलशन वेथोडी (श्रीलंका) श्री ओलहास अलिपबायव ( कझाकीस्थान), श्री क्रिस हाँग( कोरिया), श्री ब्रुनो ब्रॉंकॉर्ड ( फ्रेंच चेंबर), श्री परेश मेहता, श्री सतीनंदर आहुजा (जॉर्जिया झाकिया वर्डक (अफगाणिस्तान), श्री प्रवीण लुंकड, श्री जे के चतुर्वेदी, श्री उदय नाईक, उद्योजक श्री विठ्ठल कामत, श्री एकनाथ तांबवेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी प्रसिद्ध उद्योग जक श्री विठ्ठल कामत, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, मुंबईचे डायरेक्टर जनरल श्री संदीप खोसला, प्रसिद्ध ढोलकिवादक श्री विजय चव्हाण, सोमय्या कॉलेज,मुंबईचे प्राचार्य डॉ. एस के उकरांडे, शास्त्रज्ञ श्री हेमंत रोहेरा, शिपिंग विभागाचे श्री शब्बीर रंगवाला, आंतरराष्ट्रीय वाणिज्य व व्यापाराच्या तरुण प्रचारक श्री मनप्रितसिंग नागी, प्रसिद्ध महिला तबला वादक श्रीमती अनुराधा पाल, आर्किटेक्चर व्यावसायिक श्री प्रेम नाथ आदी मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.

या सन्मान सोहळ्याचे उत्कृष्ट प्रास्ताविक व निवेदन डॉ. संजय भिडे यांनी केले. याप्रसंगी ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आणि २९ व्या वर्धापन दिनानिमित्त इंडो मंगोलियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री या दोन आंतरराष्ट्रीय संस्थेचे व्ही आय पी पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.

डोंगरगाव (विरकुंड) येथे संत गाडगेबाबा जयंती सपन्न

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

वणी : सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशन डोंगरगाव च्या वतीने संत गाडगेबाबा जयंती निमित्य महिला मार्गदर्शन शिबीर सपन्न झाले.

भारताला लाभलेली संत परंपरा ह्या मालिकेत वेगवेगळ्या परिस्थितीत ज्या महापुरुषांनि कार्य केले ते लोकांभिमुख राहिले त्यातच विदर्भाचा मातीत जन्मलेले कुठल्याही शाळेत शिक्षण घेतले नाही तरी त्यांना चालते बोलते विद्यापीठ म्हणून ज्याची ख्याती आहे असे वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा बाबा यांच्या जयंतीच्याकार्यक्रमाला उपस्थिती उदघाटीका संस्थापिका किरणताई देरकर, प्रमुख पाहुणे वृषालीताई खानझोडे,माजी उपसभापती सरपंच कु. कविता सोयाम, ग्रा. सदस्य लता ताई हिंगाने, आशा सेविका वैशालीताई लोनगाडगे, अंगणवाडी सेविका नम्रता आमडे गावातील सर्व महीला उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रीती सोयाम यांनी केले व आभार प्रदर्शन कु. गीता कौरासे हीने केले शेकडोहून महिला ह्या प्रबोधन शिबीरला उपस्थित होत्या.

दखल न्युज भारत चे संपादक जगदीश वेन्नम यांना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

गडचिरोली : जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या सिरोंचा तालुक्यातील अतिदुर्गम, डोंगर-दऱ्यामध्ये वसलेल्या रेगुंठा येथील उच्च शिक्षित युवक दखल न्यूज भारत चे संपादक मा.जगदीश वेन्नम यांना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय सम्मान २०२२ चे पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
  
एकता फाउंडेशन च्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा पुरस्कार म्हणून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामाजिक कार्यकर्ते व बचाव कार्य,मदत कार्य,किंवा पत्रकारिता व सुशिक्षित युवकांना दिले जाते.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनाचे औचित्य साधून सदर पुरस्कार महाराष्ट्र राज्य स्थरावर गडचिरोली चे जगदीश वेन्नम यांचे पत्रकारिता, सामाजिक कार्य,हेलपिंग कार्य आधारे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी टरून जिल्ह्यात मानाचा तुरा रोवले करिता जिल्ह्यात अभिनंदनाचे वर्षाव होत आहे.

उकणी कोळसाखाणीतील कोळसा तस्करीने त्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्याही डोळ्यात घातले अंजन

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : वेकोलिच्या उकणी कोळसाखाणीतील त्या कोळसा तस्करीमुळे कोळसाखाणीतील व्यवस्थापनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अतिशय धाडसी पद्धतीने ही कोळसा तस्करी सुरु होती. कोळसाखाणीत ट्रक नेऊन बिनधास्त कोळसा भरून बाहेर पडणारे ट्रक कोळसाखाणीतील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या दृष्टीस पडू नये, याचेच नवल वाटते. कोळसाखाणीतून कोळशाची तस्करी करतांना तस्करांनी दाखविलेल्या धाडसाला पाठबळ कुणाचं, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच आहे. वेकोलि मुख्य अधिकाऱ्याच्या कर्तव्यदक्षतेचा काही दिवसांपूर्वी मोठा गाजावाजा झाला. रात्री बेरात्री हा अधिकारी कोळसाखाणींमध्ये धडकतो. कोळसाखाणीत कुठे काय सुरु आहे, याच निरीक्षण करतो. संपूर्ण कोळसाखाण पालथी घालून कर्मचारी व सुरक्षा रक्षकांची परेड घेतो. कामचुकार अधिकारी व कर्मचारी या मुख्य अधिकाऱ्याच्या नजरेतून सुटत नाही. या अधिकाऱ्याच्या रात्रीच्या गस्तीने कोळसाखाणीतील कर्मचारी चांगलेच दणाणले. त्यामुळे सर्वच कर्मचारी जबाबदारीने कामे करू लागल्याचं श्रेय या अधिकाऱ्याला मिळालं. रात्रीचा शहंशाह म्हणून हा अधिकारी ओळखला जाऊ लागला. परंतु या कोळसा तस्करीने रात्री बेरात्री गस्त घालणाऱ्या या मुख्य अधिकाऱ्याच्या डोळ्यातही झणझणीत अंजन घातलं आहे. हा शहंशाह रात्री केंव्हाही गस्त घालत असतांना देखिल ही धाडसी कोळसा तस्करी व्हावी, याला या शहंशाहचं काय म्हणावं हेच कळत नाही. या शहंशाहचा खरंच कोळसाखाणींवर वॉच होता की, नुसती वाहवाही लुटण्यासाठी त्यांनी केलेली प्रसिद्धी होती, हे प्रश्न या कोळसा तस्करीमुळे उपस्थित होऊ लागले आहेत. वेकोलिच्या कोळसाखाणीवर बारीक लक्ष ठेवणारा व रात्री कोळसाखाणींमध्ये गस्त घालणारा शहंशाह असतांना देखील तस्करांनी कोळसा तस्करीचं केलेलं धाडस हा रात्रीच्या खेळाचा कोणता भाग होता, हे कळायला आता मार्ग उरला नाही. कोळसाखाणीतील सुरक्षा व्यावस्था भेदून सुरु असलेली ही कोळसा तस्करी तस्करांच्या आपसी मतभेदामुळे उघड झाल्याचा संशय खुद्द पोलिस अधिक्षकांनी व्यक्त केला. मग शहंशाहच्या नजरे आडून किती दिवसांपासून ही कोळसा तस्करी सुरु होती, हा प्रश्नही आता उपस्थित होऊ लागला आहे. 

कोळसाखाणीत रात्री बेरात्री धडक देऊन, कर्मचाऱ्यांच्या उरात धडकी भरवणारा हा अधिकारी प्रशंसनेस पात्र ठरला. कर्तव्यात कसूर करणाऱ्या व बेजबाबदारपणे वागणाऱ्या कर्मचाऱ्यांची हा अधिकारी कसलीही गय करत नव्हता. बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर त्याने निलंबनाची देखील कार्यवाही केली. कोळशाचे उत्पादन वाढविण्याबरोबरच कोळसाखाणींतील योग्य व्यवस्थापणालाही या अधिकाऱ्याने प्राथमिकता दिली. या अधिकाऱ्याच्या कार्यकाळात कोळसा उत्पादनातही मोठी वाढ झाल्याचे सांगण्यात येते. शिस्तप्रिय असलेल्या या अधिकाऱ्याने कोळसाखाणींतील कर्मचाऱ्यांनाही शिस्त लावून कामात शिस्तबद्धता आणली. कामचुकारपणाला त्यांनी पायबंद लावला. आपल्या अनोख्या कार्यशैलीने कर्व्यदक्ष ठरलेल्या या अधिकाऱ्याला शहंशाह ही उपाधी देखील मिळाली. रात्री बेरात्री खदानीत जाऊन कर्मचाऱ्यांमध्ये धास्ती निर्माण करणाऱ्या या अधिकाऱ्याची मात्र तस्करांनी धास्ती घेतली नाही. कोळसाखाणींमध्ये गस्त घालून संपूर्ण व्यवस्थेची झडती घेणाऱ्या या अधिकाऱ्याला एवढी मोठी ही सुरु असलेली कोळसा तस्करी का गवसली नाही, ही एकच चर्चा आता संपूर्ण तालुक्यातून ऐकायला मिळत आहे. कोळसाखाणींवर वॉच ठेवणारा हा कर्तव्यदक्ष मुख्य अधिकारी नाकावर टिच्चून होणाऱ्या कोळसा तस्करीवर मात्र वॉच ठेऊ शकला नाही, या चर्चेला आता उधाण आले आहे.

काेरपना महसुल पथकाची पहाटेला कारवाई -अवैध रेती वाहनाला पकडले !


सह्याद्री न्यूज | किरण घाटे

चंद्रपूर : दिवस रात्र सुरु असलेल्या अवैध गाैण खनिजावर अंकुश व दंडात्मक कारवाया करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्याच्या अति दुर्गम भागातील काेरपना महसुल विभागाच्या पथकाने कंबर कसली असून नित्य नेमाने धडक कारवाया सुरु आहे.

या आधी काेरपनाचे मंडळ अधिकारी राजेन्द्र पचारे व महिला तलाठी रोशनी काेल्हे या शिवाय तलाठी अमाेल गाेसाई, विरेन्द्र मडावी, विशाल काेसनकर यांनी अवैध गाैण खनिज प्रकरणात धडक कारवाया केल्या आहे .अश्यातच आज शुक्रवार दि.२५ फेब्रुवारीला पहाटे ३ वाजताच्या सुमारास परसोडा येथून अवैध रेती वाहतूक करणारे पंकज बावणे रा. कोरपना यांचे ट्रॅक्टर पकडण्यात आले असुन त्या वाहनाचा क्र.MH34AP3599 असा आहे हे वाहन अवैध रेती वाहतूक करीत असताना पथकास पहाटेला मिळाले. वाहन चालका कडे कोणताच रेती वाहतुकीचा परवाना नव्हता. रेती वाहनाचा जप्ती करून ते ट्रॅक्टर दंडात्मक कारवाईसाठी तहसील कार्यालय येथे लगेच जमा करण्यात आले. उपराेक्त कारवाई काेरपनाचे तहसीलदार महेन्द्र वाकलेकर यांचे मार्गदर्शनाखाली करण्यांत आली.

या महसुल पथकात प्रामुख्याने गडचांदुरचे मंडळ अधिकारी नारायण चव्हाण,काेरपनाचे मंडळ अधिकारी राजेंद्र पचारे, तलाठी नामदेव मेश्राम, प्रदीप जाधव यांचा सहभाग आहे. सातत्याने महसुल विभागाच्या अवैध गाैण खनिज प्रकरणात या भागात धडक कारवाया सुरु आहे. हे विशेष! काल गुरुवारी गडचांदूरचे मंडळ अधिकारी नारायण चव्हाण यांनी आवाळपूर बसस्टँड परिसरात अवैध मुरुमाचे एक वाहन पकडले.

सदरहु वाहन राजेन्द्र महादेव खेडेकर यांचे मालकीचे असल्याचे समजते.रात्रीच्या वेळेस काेरपना या भागात अवैध गाैण खनिज वाहतुक सुरु असुन महसुल पथकाच्याही कारवाया सातत्याने सुरु आहे.

विवाहित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, सिंधी येथील घटना

सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 

मारेगाव : एका विवाहित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. तालुक्यातील सिंधी (कुंभा) येथे आज संध्याकाळी सव्वा सात च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. त्याने असे टोकाचे पाऊल उचलल्याने गावात शोककळा पसरली.

वैभव मारोती वैद्य (२८) असे गळफास घेऊन आत्महत्या केले लेल्या मृतकाचे नाव आहे. गेल्या वर्षीच त्याचे लग्न झाले होते. वैभव ची पत्नी गर्भवती होती. ती प्रसूतीसाठी माहेरी गेली होती. आज (ता.२४) गुरुवारी रोजी सकाळी मृतक वैभव हा शेतात कामाला गेला होता. त्यानंतर संध्याकाळच्या सुमारास तो घरी परत आला होता. घरी कुणीच नसल्याची संधी साधून त्याने घराच्या सिलिंग फॅनला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला. सव्वा सात च्या जवळपास ही घटना वैद्य कुटुंबीयांच्या लक्षात आली. पोलीस पाटीलांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्याच्या पश्चात आई,वडील आणि पत्नी असा परिवार आहे. वैभवने आत्महत्या का केली सध्या तरी कारण समजू शकले नाही. 

घटनेचा तपास पोलीस करीत आहे. 

अचानक सोन्याला आली चकाकी, सोन्याच्या भावात झाली मोठी वाढ, एकाच दिवसात दोन हजार रुपयांनी वाढलं सोनं

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : सोन्याच्या भावात आज अचानक मोठी वाढ झाल्याने येणाऱ्या काही दिवसांत सोन्याचे दर गगनाला भिडतील ही चर्चा शहरात पसरल्याने नागरिकांनी सोने खरेदी करण्याकरिता सोने चांदीच्या दुकानात एकच गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. आठ ते दहा दिवसांत सोन्याचा भाव मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचे सूतोवाच आज शहरातील सोना चांदीच्या दुकानदारांकडून ऐकायला मिळाले. सोन्याचे भाव भरमसाठ वाढणार असल्याच्या चर्चेने शहरात वादळ उठल्याने सोने खरेदी करण्याकरिता नागरिकांनी आज सोनाचांदीच्या दुकानांची वाट धरली. युक्रेन व रशिया मध्ये युद्ध छेडल्याचा संदर्भ या अचानक झालेल्या घसघशीत वाढीला दिला जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांत सोन्याच्या भावात मोठी वाढ झाल्यास सोने खरेदी करतांना आर्थिक भुर्दंड बसू नये म्हणून नागरिकांनी ज्वेलर्समध्ये चांगलीच गर्दी केली. लग्नसराईचे दिवस सुरु असल्याने या काळात सोन्याला मोठी मागणी असते. सोने खरेदी शिवाय लग्नच पूर्ण होत नसल्याने वाढणाऱ्या किमती लक्षात घेता आधीच सोने खरेदी करून ठेवलेले बरे, या कल्पलकतेतून आज शहरात सोने खरेदीला उधाण आले. सोन्याचे भाव एकाच दिवसात ५३ हजार ८०० रुपये प्रति तोळा झाल्याने सोन्याचे भाव वधारणार असल्याची चर्चा शहरात पसरली. आठ ते दहा दिवसांत सोने ५५ हजाराचा टप्पा पार करेल, ही शक्यता वर्तविण्यात येत असल्याने नागरिकही सोने खरेदीवर तुटून पडले. १५ दिवसांआधी ५० हजार रुपये तोळा असलेलं सोनं मागच्या आठवड्यात ५१ हजार ८०० रुपये पर्यंत वाढलं. आज अचानक सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली. ५१ हजार ८०० रुपये प्रति तोळा असलेलं सोनं सकाळी ५२ हजार ८०० रुपये व दुपार नंतर लगेच ५३ हजार ८०० रुपये प्रति तोळा पर्यंत वृद्धावलं. अशीच सोन्याच्या भावात वाढ झाल्यास येणाऱ्या काही दिवसांत सोन्याचे भाव गगनाला भिडणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील विकास कामांना गती

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नांना यश आले असून २३ फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात झालेल्या बैठकीत तिन मोठ्या कामांना मंजूरी मिळाली आहे. यात वढा तिर्थक्षेत्र, संत जगनाडे महाराज समाधी स्थळ आणि ईरइ नदिचे सौदर्यीकरण आदि कामांचा समावेश असून १६८ कोटी रुपयांतून सदर क्षेत्रांचा विकास केल्या जाणार आहे.

विदर्भाचे पंढरपूर असलेल्या वढा तिर्थक्षेत्राला पर्यटनस्थळाचा दर्जा देत येथे विकास कामे करण्यात यावी अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडून सातत्याने केली जात होती. याबाबत मुंबई स्तरावर त्यांचा पाठपूरावाही सुरु होता. तसेच संत जगनाडे महाराज यांच्या समाधी स्थळाचा विकास करण्यात यावा या करिताही आमदार किशोर जोरगेवार आग्रही होते. इरई नदीचे खोलिकरण करुन तेथे सौदर्यीकरण करण्यात यावे या करिताही आमदार जोरगेवार यांचा पत्रव्यवहार सुरु होता. अखेर आता सदरहु सर्व कामांसाठी मोठा निधी देण्याची घोषणा करण्यात आली आहे. काल २३ फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात पार पडलेल्या बैठकीत सदर कामांना मंजूरी देण्यात आली आहे. यात वढा तिथक्षेत्राचा पर्यटन दृष्ट्या विकास करण्यासाठी ४४ कोटी, संत जगनाडे महाराज यांच्या समाधी स्थळाचा पर्यटन विकास करण्यासाठी ७४ कोटी तर चंद्रपूर शहरालगत असलेल्या ईरइ नदीच्या खोलीकरण, सौदर्यीकरण, आणि संवर्धनाकरिता ५० कोटी रुपयांचा निधी घोषीत करण्यात आला आहे. त्यामूळे आता लवकर सदरहु सर्व ठिकाणांची कायापलट होणार असून पर्यटनास वाव मिळणार आहे. सदरहु कामांसाठी मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनीही सातत्याने पाठपूरावा केला होता. हे कामे करण्यात यावी या करीता त्यांचेही प्रयत्न सुरु होते. त्यामूळे हे कामे मंजूर केल्याबदल आमदार जोरगेवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे आभार मानले आहे.

दिव्यांग बांधवाच्या विविध मागण्यासाठी चंपतराव डाकोरे पाटिल यांनी दिले गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

सह्याद्री न्यूज नेटवर्क |

किनवट : येथील गटविकास अधिकारी यांना दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांच्या नेतृत्वाखाली किनवट तालुका अध्यक्ष अंकुश राठोड, महीला अध्यक्ष बालीताई जागनेवाड, शिष्टमंडळ गटविकास अधिकारी व नायब तहसीलदार किनवट यांना भेटून निवेदनातील प्रश्नावर चर्चा करीत असता दोन्ही अधिकारी यांना ऊतर देता आले नाही. 
     
आज दिनांक 24 फेब्रुवारी रोजी निवेदन देण्यात आले यावेळी डाकोरे पाटिल यांनी गटविकास अधिकारी यांना सात प्रश्न व तहसिलदार साहेब यांना नऊ प्रश्नाचे लेखी ऊतर दि 9 मार्च 22 पर्यंत दोन्ही कार्यालयाकडून निवेदनाद्वारे माहिती व हक्क खालील मागण्याची दखल न घेतल्यास दि 13 मार्च 22 पासुन जिल्हाधिकारी नांदेड येथे दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांच्या नेतृत्वाखाली बेमुधत धरणे व आंदोलन करण्याचा इशारा दिला.

 दिव्यांग बांधवाच्या मागणी असलेले प्रश्न पुढील प्रमाणे :

1) दिव्यांग मित्र अॅप नांदेड
दिव्यांग व्यक्तीसाठी असलेल्या समाज कल्याण विभागाच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व सुविधा दिव्यांगाला घरपोच मिळण्याकरीता दिव्यांग मित्र अॅप नांदेड ची निर्मिती नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री व माजी जिल्हाधिकारी नांदेड यांनी केली व एकही दिव्यांग वंचित राहू नये वेळेचे बंधन वेळापञक 14 जुलै ते 31 जुलै 20 नाव नोंदणी व दि .1 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट 20 पर्यंत छाननी व 15 ऑगस्ट 20 ला लाभ देण्याचे व एकहि दिव्यांग वंचित राहिल्यास कार्यवाही करण्यात येईल असे लेखी आदेश दिले असता अठरा महिन्यात आपल्या तालुक्यात किती दिव्यांगाची दिव्यांग मिञ अँप मध्ये नोंदणी,मंजुरी,किती दिव्यांगाना लाभ दिला वरीष्ठाचे वेळापञक व आदेश न माननार्या अधिकारी यांच्यावर आपण काय कार्यवाही केली.त्याची यादीसहित माहिती त्वरित देण्यात यावी.
2) दिव्यांग कायदा 2016 ची अंमलबजावणी दिव्यांग बांधवाना सर्व सामान्य जनतेसारखे जीवन जगता यावे म्हणून त्यांना त्यांचे हक्क व अधिकार मिळावा म्हणून दिव्यांग हक्क 2016 च्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून आपल्या कार्यालयासहित किती ग्रामपंचायत ने दिव्यांगाच्या ग्रामसभा किंव्हा बैठकीत माहिती दिली त्यांची माहिती रजिस्टर सहित देण्यात यावी.
3) दिव्यांग साहित्य व पायाभूत साधने शिबीर
नांदेड जिल्ह्यातील डिसेंबर 2019 मध्ये दिव्यांगासाठी पायाभूत साधने व साहित्य मोजमाप शिबीराचे आयोजन करून लाखो रुपये खर्च करण्यात येऊन अनेक दिव्यांगाना साहित्य का मिळत नाही ते आज हि आपल्या पंचायत समिती का? पडुन आहे आज पर्यंत किती दिव्यांगाना वाटप केले किती देणे बाकी आहे त्याच्या कारणासहित लाभार्थी यादीसहित त्वरीत माहिती देण्यात यावी.
4) दिव्याग राखीव पाच टक्के निधी ग्रामपंचायत, व पंचायत समिती, येथे 2016 ते 2021 पर्यंत आज पर्यंत आपल्या तालुक्यातील किती ग्रामपंचायत व आपल्या कार्यालयातून किती वेळेस दिव्यांग निधी देण्यात आला त्या लाभार्थी रक्कमेसहित यादी देण्यात यावी. दिव्यांग पाच टक्के निधी दिला नसेल तर का देण्यात आला नाही ते कारणासहित माहिती त्वरित देण्यात यावी. 
5) म.ग्रा.रो.ह.योजनेत दिव्यांगाला काम मिळेना
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत दिव्यांगाला दरवर्षी किमान 100 दिवस गावातच रोजगार देण्याची तरतूद करण्यात आली आहे. आपल्या तालुक्यातील किती गावात दिव्यांगाना काम किंव्हा बेरोजगार बता देण्यात आला किंव्हा नाही दिला तर त्यांचे कारणासहित दिव्यांग लाभार्थी यादीसहित माहिती देण्यात यावी.
 6) दिव्यांगाला स्वयंरोज गारासाठी जागा
गावातील शासकिय व निमशासकीय कार्यालयात व कार्यालयीन परिसरात दिव्यांगाला स्वयं रोजगारासाठी 200 स्केअर फुट जागा देण्याबाबत शासन निर्णय व परिपत्रक काढण्यात आले आहे. आपल्या कार्यालयासहित किती ग्रामपंचायत ने दिव्यांगाना जागा देऊन किती दिव्यांगाना आधार दिला जर दिला नसेल तर कारणासहित लाभार्थी यादीसहित माहिती त्वरीत देण्यात यावी. 
7) दिव्यांग बांधवाना घरकुल योजनेत प्राधान्य म्हणून पाच टक्के प्रमाणे घरकुल आपल्या तालुक्यात किती गावात दिव्यांगाना लाभ देण्यात आला व नाही दिला तर त्यांच्या कारणासहीत लाभार्थी यादी देण्यात यावी.
    
यावेळी दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल, तालुका अध्यक्ष अंकुश राठोड, सचिव गणेश जाधव, महीला अध्यक्ष बालीताई जानगेनवाड, आनंदराव मेश्राम, गजानन लामसोंगे, देवराव आञाम, पायल आडे छाया वानखेडे, गोंविद वाकोडे, शेख गौस, देवानंद सोनकांबळे ईत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

वणी विभागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडुन स्वप्नील धुर्वे यांच्या नेतृत्वात ईडी च्या अधिकाऱ्यांना बांगड्या ची भेट


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

वणी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चे नेते नवाब मलिक यांना ईडी कडून अटक करण्यात आली त्याचेच पडसाद आज वणी मध्ये पहायला मिळाले, वणी विभागातील युवकाच्या पुढाकारातून ईडी (ED) च्या अधिकाऱ्यांना बांगड्या चे डब्बे पोस्टा मार्फत यांचा अर्थ मंत्री भारत सरकार यांना पाठवुन निषेध आंदोलन करण्यात आले आहे.

भारत सरकार चा वित्त विभागाच्या अधीनीस्त असलेली संस्था अंमलबजावणी संचालनालय (ई.डी) यांनी राजकीय द्वेषा पोटी नवाब मलिक यांचा वर अटकेची कार्यवाही केलेली आहे. हि कार्यवाही लोकशाही साठी घातक आहे, ईडी तील सनदी अधिकारी हे केन्द्र सरकार चे बाहुले झालेले आहे, आज पर्यंतच्या इतिहासामध्ये अश्या कार्यवाही कधीच झालेली नाही.

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्या करीता केन्द्र सरकार ई.डी (ED) ला हाताशी धरुन राज्यातील मंत्र्यांना बदनाम करायचे काम मोदी सरकार करत आहे, असा आरोप राष्ट्रवादी चे जिल्हा सरचिटणीस स्वप्नील धुर्वे यांनी केला आहे. पोस्टामार्फत बांगड्या चे डब्बे उपविभागीय अधिकाऱ्यांनी मार्फत निवेदन पाठविण्यात आले आहे.
या वेळी राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस स्वप्नील धुर्वे, सुर्यकांत खाडे,विजय नगराळे, तालुकाध्यक्ष हेमंत गावंडे, शहराध्यक्ष मनोज वाकटी, राजु उपरकार, गुणवंत टोंगे, रामकृष्ण वैद्य,वैशाली तायडे, नागभीडकर, प्रणय बल्की, बंटी प्रेमकुंटावार, सचिन वालदे, जयस्वाल,सचीन चव्हाण,प्रणय बल्की,अनिकेत थेरे, समीर भादंकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

महसूल विभागाची धडक कारवाई, अवैध रेती वाहणारे ट्रॅक्टर जप्त

सह्याद्री न्यूज | किरण घाटे

चंद्रपूर : जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर,  राजूराचे एसडीआे संपत खलाटे व काेरपनाचे तहसीलदार महेन्द्र वाकलेकर यांचे मार्गदर्शनाखाली काेरपनाचे मंडळ अधिकारी राजेन्द्र पचारे यांनी व त्यांचे महसुल पथकांनी स्वताच्या प्राणाची पर्वा न करता आज गुरुवार दि.२४ फेब्रुवारीला भल्या पहाटे गुप्त माहितीच्या आधारे अवैध रेतीची वाहने पकडल्याचे नुकतेच वृत्त प्राप्त झाले आहे. ही अवैध रेतीची ट्रॅक्टर पकडण्यासाठी मंडळ अधिकारी पचारे व त्यांचे महसुल पथकांस अख्खी रात्र जागुन काढावी लागली असल्याचे बाेलल्या जाते.

 गेल्या काही दिवसांपासून पैनगंगा नदीच्या पात्रातुन रेती तस्करांनी महसुल विभागाच्या पथकाची नजर चुकवून व पाळत ठेवून वाहनाव्दारे रेती नेण्यांचा सपाटा लावला हाेता. या बाबत मंडळ अधिकारी पचारे यांनी या बाबतीत सर्व माहिती घेत अश्या अवैध गाैण खनिज वाहनांना पकडण्यांची जाेरदार माेहिम सुरु केली आहे. ब-याच वाहनांना महसुल पथकाच्या सहाय्याने पकडुन त्या वाहनांना दंडात्मक कारवायांसाठी तहसील कार्यालयात जमा केले आहे. वाहने पकडल्या जावू नये या साठी रेती तस्करांनी पाळत ठेवणारे राेजंदारीचे व्यक्ती या भागात ठेवले जरी असले तरी पचारे यांचे कारवाया मात्र तेवढ्याच जाेमात सुरु आहे.या भागात नित्य अवैध गाैण खनिज वाहने (वेळ प्रसंगी जीव धाेक्यात) टाकुन पकडल्या जात आहे. मुजाेर रेती तस्करांच्या मुसक्या आवळण्यांचे काम काेरपना महसुल पथक करीत आहे. त्यामुळे अवैध रेती तस्करांचे अक्षरश: धाबे दणाणले आहे तर शासनाच्या तिजाेरीत दंडात्मक कारवायापाेटी माेठा प्रमाणात महसुल जमा हाेत आहे.दरम्यान आज पहाटेला ४ वाजता अनिल मधुकर चांदेकर व मिथुन एलय्या पवार यांचे मालकीचे असलेले अवैध रेतींची वाहने मंडळ अधिकारी राजेन्द्र पचारे, पटवारी विरेन्द्र मडावी, प्रभाकर कुळमेथे, रुपेश पाहनपटे, सुरेश नागाेशे यांनी पाठलाग करुन पकडली सदरहु पकडलेल्या वाहनांची माहिती पचारे यांनी तात्काळ तहसीलदार महेन्द्र वाकलेकर यांना देतांच त्यांनी ती वाहने तात्काळ जप्तीनामा करुन तहसील कार्यालयात जमा करण्यांस सुचित केले. याच अवैध रेती प्रकरणात काेरपनाचा रेती तस्कर अनिल चांदेकर यांचे ट्रॅक्टर पकडण्यांत आले असुन त्याने या पुर्वी अनेकदा याच भागातुन अवैध रेती वाहनाव्दारे नेली असल्याची या परिसरात चर्चा आहे. प्रथमच त्याचे अवैध रेतीचे वाहन महसुल पथकाच्या जाळ्यात अडकले.अनेकदा याच चांदेकरने अवैध रेती तस्करांच्या बाबतीत ताेंडी तक्रारी वरिष्ठांकडे केल्या असल्याचे बाेलल्या जाते. आजच्या कारवाया करतांना ही अवैध वाहने पळून जाण्याच्या बेतात असतांना महसुल पथकाने पाठलाग करुन पकडली. महसुल पथकास या वेळी धमकविण्याचा प्रकार देखिल रेती वाहतुकदारांकडुन केला गेला असल्याचे विश्वासनिय सुत्राने प्रतिनिधीस सांगितले. सदरहु वाहन चालकाजवळ वाहन परवाना नसल्याचे समजते.

या भागातील अनेक गावात शेती उपयोगी परवाना असणारे ट्रॅक्टर आता अवैध रेती वाहतुकीत गुंतली असल्याचे एकंदरीत दिसते.

राळेगाव : शिवजयंती निमित्य मोफत ई-श्रम कार्ड नोंदणी व वितरण - अमित ढोबळे यांचा अभिनव उपक्रम


सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

राळेगाव : हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त प्रहार संघटनेचे अमित ढोबळे यांच्या मार्फत सावरखेड येथील मोफत ई-श्रम कार्ड वाटप करून शिवजयंती साजरी करण्यात आली.

यावेळी बोलतांना गावातील सर्व समस्या सोडविण्यासाठी सदैव प्रयत्नरत राहील असे प्रहारचे अमित ढोबळे यांनी गावकऱ्यांना ग्वाही दिली. राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या विचाराने अमित ढोबळे यांनी आपल्या परिसरात मोठ्या उत्साहाने काम चालू केले आहे. गावातील समस्याचे प्रशासन दरबारी मांडत त्या मार्गी लावण्य्साठी नेहमी पाठपुरावा करत असतात. गावातील सर्व संघटीत कामगारांनी ई - श्रम कार्ड नोंदणी केली तसेच त्यांना कार्डचे वितरणही करण्यात आले. या वेळी कार्यक्रमाचे उद्घाटन निलेश रोठे माजी सभापती पं.स राळेगाव यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी राहुल चिघघाटे, निलेश पिंपरे, मंगेश आत्राम, मोहन जुनघरे, काशिनाथ टेकाम, आकाश ढोबळे, मुकेश आत्राम, सुधाकर मेश्राम, स्वप्नील तोडासे, विनोद जुनघरे, साईनाथ टेकाम, दिलीप,  अनिल निंबादेवी, श्रीकांत ढोबळे, सुरेश जुनघरे तसेच इतर प्रहार सेवक उपस्थित होते.

डॉ बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथ संपदा प्रत्येकाने वाचली पाहीजे - शिवा प्रधान


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

अमरावती : येथील बौध्द उपासक संघ भिमटेकडी,परीसर अमरावतीच्या वतीने आयोजीत संडे मिशनचा कार्यक्रम नुकताच सपन्न झाला. 
कार्यक्रमाच्या प्रारंभी बौध्द उपासक संघाचे अध्यक्ष मा शिवा प्रधान यांचे हस्ते व प्रमुख अतिथी मा प्रभाकर गवई या मान्यवरांनी दिप प्रज्वलन करुन भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व तथागथ भगवान गौतम बुध्द यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून अभिवादन केले.

बुध्द वंदना सामुहीक घेण्यात आली तसेच आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आदराणीय अशोकराव झटाले यांच्या निधनाबद्दल त्यांना सामूहीक आदरांजली देण्यात आली. तदनंतर मंचावरील मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत करण्यात आले. 
कार्यक्रमा चे प्रास्ताविक ऊपासक संघाचे कोषाध्यक्ष मा गंगाधरराव ईंगळे यांनी केले सदर कार्यक्रमामध्ये मा संजय बनसोड संचालक शासकीय ग्रंथालय महाराष्ट्र शासन मुंबई यांनी अभ्यासीकेच्या विद्यार्थ्याना स्टेज डेअरींग यावे या करीता त्यांचा समन्वय असावा असे कार्यक्रमात सांगितले. 

सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष,बौध्द उपासक संघाचे अध्यक्ष, आंबेडकरी विचारवंत मा शिवा प्रधान अध्यक्षीय भाषणात बोलतांना ते म्हणाले की आजच्या दिवसी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी काँग्रेस आणि गांधी,यांनी अस्पृश्यतेबाबत काय केले हा ग्रंथ लिखानास प्रारंभ केला तो हा ऐतिहासिक दिवस होय डॉ बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथ संपदा खुप विपूल आहे, ती मानवाच्या ती सर्वहारा मानव मुक्तीचे सुक्त उजागर करणारी आहे. महात्मा गांधी आणि काँग्रेस अस्पृश्यांना यांनी अस्पृश्य संदर्भात काय कार्य केले कसाकसा बाबासाहेबांना विरोध झाला स्वतंञ्य मतदार संघ ईग्रजांशी गांधीचा पञव्यवहार त्यांच्या शिफारसी हा असा तत्काळातला शिरस्ता आहे माञ, बाबासाहेबांनी स्वातंञ्य समता बंधूता यांची कास धरत न्यायाची व राष्ट्राची एकात्म भूमीका घेवून कार्य केले बाबासाहेबांची कार्यप्रणाली समतेच्या अधिष्ठानावर आरुढ आहे बाबासाहेबांनी विविध ग्रंथ लिहून तमाम भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला तत्वज्ञानाची अनमोल संजीवनी दिली आहे. एक सत्याचा वैचारिक वारसा दिलेला आहे माञ, तो सर्वानी वाचणे गरजेचा आहे. बाबासाहेबांना समजून घेतांना त्यांची ग्रंथ संपदा प्रत्येकाने वाचली पाहीजे त्यामूळे बाबासाहेबांचे मनोहारी विचार सौंदर्य प्रत्येकाला मोहित केल्याशिवाय राहत नाही बाबासाहेबांच्या विचारातील सामाजीक तत्वे यांचा विचार करून समाजात एकसंघता कशी राहील या बाबीकडे सर्व जातीधर्माच्या पलीकडे जावून राष्ट्र हीत जपणे सुध्दा महत्वाचे आहे. त्यामूऴे संविधानात याची विचार सरणी अंतःर्भूत आहे तीला आपण सर्वजण मिळून जपूया आजच्या दिनाचा संकल्प धरुया असे मौलिक प्रतिपादन "संडे मिशन" या बौध्द उपासक संघाच्या कार्यक्रमात केले आहे.
या प्रसंगी उपासक संघाचे सदस्य मा प्रभाकरराव गवई व शरद सोनोनो यांच्या वाढदिवस प्रित्यर्थ त्यांना मा शिवा प्रधान यांचे हस्ते पुष्पगुच्छ व ग्रंथ त्यांना देवून अभिष्टचींतनपर सदीच्छा दिल्या, कार्यक्रमाचे सुञ संचालन आयू ज्योती बोरकर यांनी केले, आभार प्रदर्शन आयु डी के बागडे यांनी केले. 

सदर कार्यक्रमात प्रामूख्याने उपस्थितामध्ये आयु डी जी वानखडे, आयु एस बी खोब्रागडे, नामदेवराव वाघमारे, सूर्यभान बनसोड, सुधाकर राउत, प्रभाकर गवई, शरद सोनोने, अवधूत गजभीये, गोपाळ रामटेके, नलीनी नागदिवे, प्रतिभा प्रधान, अनिता रोडगे, प्रभाकर गाडगे, वर्षा गाडगे, गंगाधर ईंगळे, बापूराव गुळसुंदरे, व्यंकट खोब्रागडे, अस्मीता सोमकुवर, माला चव्हान, ज्योती बोरकर, डी के बागडे, प्राजक्ता सोमकुवर आदी उपस्थिती होती, बराच वेळ चाललेल्या या कार्यक्रमाची सांगता भिक्खूणी प्रजापती यांच्या आशिर्वाद गाथेने संपन्न झाली. अशी माहिती सहसचिव नामदेवराव वाघमारे यांनी दिली.
 

वाघाने पाडला गायी चा फडशा, फिस्की जंगल परिसरातील घटना


सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 

मारेगाव : तालुक्‍यातील सालेभट्टी शिवाराला लागुन असलेले फिस्की च्या जंगल परिसरात वाघाने हल्ला करून एका गायीला ठार केले.

सालेभट्टी येथील तुळशीराम लोनसावडे यांचे पशुधन बुधवारी चराई ला शिवारात गेली. रात्री ती परत न आल्यामुळे त्यांनी रात्रीच खूप शोध घेतला. परंतु तीचा शोध लागला नाही. गुरुवारी (ता. २४) पहाटेच्या सुमारास सालेभट्टी शिवारात फिस्कीच्या जंगलात पट्‌टेदार वाघ व त्याच्या बाजूला मृत गाय आढळून आली.

वाघाला पाहून तो घाबरून परत गावाकडे आला. गावातील काही लोकांना घेऊन पुन्हा त्या घटनास्थळी पोहोचला. दिवस उजाडला असल्यामुळे वाघ तेथून पसार झाला होता.

या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली आहे.

दिग्रस येथे मोफत ई-श्रम कार्ड नोंदणी शिबीर संपन्न

सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 

झरी जामणी : असंघटित कष्टकऱ्यांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी, श्रमजीवींना सामाजिक सुरक्षा मिळवून देण्यासाठी तसेच सरकारकडून राबविल्या जाणार्‍या विविध योजनांचा लाभ कष्टकऱ्यांना मिळावा यासाठी झरी जामणी तालुक्यातील दिग्रस ग्रापमपंचायतीचे सरपंच तथा सरपंच सेवा संघाचे तालुका अध्यक्ष निलेश येल्टीवार यांनी असंघटित कामगारांची ई-श्रम कार्ड नोंदणी निःशुल्क करून दिली.

लहान व सिमांत शेतकरी, शेतमजूर, सुतार, कुंभार, न्हावी, पशुपालन करणारे, रस्त्यावरचे विक्रेते, बांधकाम कामगार, दुध उत्पादक, लेदर कामगार, भाजी विक्रेते, फळ विक्रेते, ऑटो चालक, गवंडी, लोहार, प्लंबर, इलेक्ट्रिशियन व ईतर श्रमजीवी काम करणाऱ्या कामगारांना कामाच्या मोबदल्या व्यतिरिक्त कोणतेही लाभ मिळत नाहीत. त्यांनाही सामाजिक सुरक्षा मिळावी व विमा योजनांचा लाभ मिळावा याकरीता सरपंच निलेश येल्टीवार यांनी त्यांच्या दिग्रस गावात ई-श्रम कार्ड नोंदणीच्या माध्यमातून असंघटित कामगारांना संघटीत केले.

राज्य मराठी हौशी संगीत नाट्य स्पर्धेचे ‘संगीतसूर्य केशवराव भोसले संगीत नाट्य स्पर्धा’ असे नामकरण

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

मुंबई : उदयोन्मुख कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे आणि नाट्य कलेचा प्रचार व प्रसार सर्व स्तरातून व्हावा या उद्देशाने आयोजित होणाऱ्या राज्य मराठी हौशी संगीत नाट्य स्पर्धेचे ‘संगीतसूर्य केशवराव भोसले संगीत नाट्य स्पर्धा’ असे नामकरण करण्यात आले असल्यासंदर्भातील शासन निर्णय पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने निर्गमित केला आहे.

नव कलाकारांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, त्या कलागुणांमधून व्यक्तिमत्व विकास घडवून आणावा यासाठी शासनामार्फत गेली ६० वर्षे या राज्य नाट्य स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. सांस्कृतिक कार्य विभागामार्फत मराठी, हिंदी, संगीत, संस्कृत, बालनाट्य व दिव्यांग बालनाट्य या स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. त्यातीलच राज्य हौशी मराठी संगीत नाट्य स्पर्धा ही एक राज्यस्तरीय स्पर्धा आहे. या स्पर्धेस संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या स्मृतीशताब्दी वर्षानिमित्त त्यांचे नाव देण्यात आले आहे.

केशवराव भोसले यांनी संगीत शारदा, संगीत सौभद्र, संगीत मृच्छकटीक, संगीत मानापमान अशी अनेक अजरामर नाटके सादर केली. संगीत नाटक या प्रकारातील एक अतुलनीय अभिनेते व गायक म्हणून त्यांचा गौरव व्हावा या उद्देशाने राज्य हौशी मराठी संगीत नाट्य स्पर्धेचे संगीतसूर्य केशवराव भोसले संगीत नाट्य स्पर्धा असे नामकरण करण्यात आले आहे, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

इरई नदीच्या खोलीकरणाचे काम त्वरित सुरू करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

चंद्रपूर : इरई नदी ही चंद्रपूर शहरालगत असून सरासरी सात किलोमीटर ती शहराला समांतर वाहते. नदीचे पात्र रुंद झाल्यामुळे पावसाळ्यात अनेकदा पूर परिस्थिती निर्माण होते. ही बाब जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी निदर्शनास आणून दिली आहे. प्रशासनाने पहिल्या टप्प्यात तात्काळ उपाययोजना म्हणून नदीच्या खोलीकरणाचे काम सुरू करावे, अशा सूचना वित्त व नियोजन मंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

जिल्ह्यातील इरई नदी व वढा तीर्थक्षेत्राच्या विकासासंदर्भात मुंबई येथे आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, आमदार किशोर जोरगेवार उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री म्हणाले, इरई नदीचे खोलीकरण, सौंदर्यीकरण व संवर्धन करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार हे सतत पाठपुरावा करीत आहेत. शासनही यासाठी सकारात्मक आहे. पहिल्या टप्प्यात नदीचे पात्र मोकळे केले तर पाणी कुठे थांबते, कुठून निघून जाते, पूर परिस्थिती कशामुळे निर्माण होते, या बाबींचा अंदाज येईल. त्यामुळे नदीचा गाळ काढून खोलीकरण करणे आवश्यक आहे. या कामाकरिता विदर्भ सिंचन महामंडळाकडील मशीन उपलब्ध करून दिल्या जातील. जिल्हा नियोजन समितीमधून डीझेलसाठी निधीची तरतूद करावी. जेणेकरून सदर मशीनद्वारे कामाला तात्काळ सुरवात होईल. पुढील वर्षी इरई नदीच्या संवर्धनासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.

निधी उपलब्ध करून देण्याची पालकमंत्र्यांची मागणी

इरई नदी ही शहरातून वाहत असून नदीचे पात्र रुंद झाल्यामुळे पुराचा धोका निर्माण होतो. त्यामुळे पहिल्या टप्प्यात नदीच्या पात्रातील झाडे-झुडपे, अतिक्रमण, गाळ काढणे आणि खोलीकरणासाठी तर दुसऱ्या टप्प्यात सुशोभीकरण, सौंदर्यीकरण, संवर्धन, बंधारे आणि विकासासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली. यावेळी ते म्हणाले, पुराच्या प्रतिबंधासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाद्वारे पैसे देण्याची तरतूद आहे. ते त्वरित दिले जाईल. तर गॅबियन बंधाऱ्यासाठी जलसंपदा विभागाने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

वढा तीर्थक्षेत्राच्या विकासाबाबत पालकमंत्री म्हणाले, वर्धा आणि पैनगंगा नदीच्या संगमावर असलेले वढा हे ‘ब’ दर्जाचे तीर्थक्षेत्र होण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. ग्रीन बिल्डींग संकल्पनेवर आधारीत या तीर्थक्षेत्राचा विकास होणार असून त्यासाठी जांभा दगडाचा वापर केला जाईल. वढा तिर्थक्षेत्र व पर्यटन विकासाच्या याप्रकल्पासाठी 44 कोटी रुपये प्रस्तावित आहे. दोन वर्षात 25 कोटी रुपये उपलब्ध करून दिल्यास उर्वरीत निधी खनीज विकास निधी व नियोजन समितीतून देता येईल. वढा येथे साक्षात ‘प्रति पंढरी’ साकारण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, असेही ते म्हणाले.

नदीच्या संपूर्ण लांबीमधील स्वच्छता व खोलीकरणासाठी (17 किमी.) अंदाजित 25 कोटी, नदीच्या डाव्या किंवा उजव्या बाजूने एक किमीपर्यंत नदीतट विकास व सौंदर्यीकरण व सुशोभीकरणाची कामे अंदाजित किंमत 200 कोटी, दाताळा पुलाखालील भागात 228 मीटर लांबीच्या बंधा-याचे बांधकाम अंदाजित किंमत 20 कोटी, नदीच्या डाव्या व उजव्या तिरावरील सहा किलोमीटर संरक्षक आधार भिंत व माती भिंतीच्या बांधकामाकरीता अंदाजित 320 कोटी व इतर करावयाची कामे 7 कोटी असे एकूण अंदाजित 572 कोटींचा प्रकल्प प्रस्तावित असल्याची माहिती अधिक्षक अभियंता (पाटबंधारे) पद्माकर पाटील यांनी दिली.

बैठकीला व्हीसीद्वारे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, अधिक्षक अभियंता सुषमा साखरवाडे (सा.बा.विभाग), पद्माकर पाटील (पाटबंधारे विभाग), जिल्हा नियोजन अधिकारी गजानन वायाळ, कार्यकारी अभियंता एस.बी. काळे, श्री. कुंभे, उपविभागीय अभियंता दि.ना. मदनकर आदी उपस्थित होते.

राज्य उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सकारात्मक आश्वासनानंतर महाराष्ट्र सरकारी कर्मचारी संघटनेचा संप मागे !

 सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
             
चंद्रपूर : प्रलंबित मागण्या व NPS योजना रद्द करुन जुनी परीभाषित पेन्शन योजना शासकीय कर्मचाऱ्यांना लागू करण्याकरीता दि. 23 व 24 फेब्रुवारीला राज्य सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी राज्यव्यापी लाक्षणिक संपावर जाणार होते परंतु राज्य सरकारतर्फे उपमुख्यमंत्री यांनी संघटनेला चर्चेसाठी पाचारण केले व त्यांचेशी मागण्यासंदर्भात 2 तास सविस्तर चर्चा झाली. 
      
त्या चर्चेच्या अनुषंगाने जुनी पेंशन योजना देऊ शकणार नाही अशी भुमिका घेणाऱ्या राज्य सरकारने पहिल्यांदाच NPS योजनेमध्ये राज्य सरकार देत असलेल्या 14 टक्के अनुदानाची एकूण रक्कम किती होती हे पाहून याबाबत राज्यातल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना देण्यासंदर्भात निर्णय घेऊ व केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना जे लागू आहे ते लागू करु असे आश्वासन या चर्चे दरम्यान दिले. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी एकत्रित माहिती गोळा करण्यासाठी राज्य सरकारलाही काही वेळ लागणार आहे तसेच राज्य शासनाचे या वर्षीचा अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर एप्रिल पासून बक्षी समितीच्या शिफारशी लागू करण्याचा शब्द उपमुख्यमंत्र्यांनी दिला आहे तसेच इतरही मागण्यांच्या संदर्भामध्ये सकारात्मकरीत्या निर्णय माहे एप्रिल पासून घेण्यासंदर्भात शब्द उपमुख्यमंत्री यांनी दिला आहे .या सर्व बाबींचा आज मध्यरात्री पासून सुरू झालेल्या राज्यभरातील 17 लाख कर्मचार्यांचे नेतृत्व करणाऱ्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सर्वानुमते राज्य सरकारला जुन्या पेन्शनसह इतर सर्व मागण्यांबाबत उपमुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे. त्याअनुषंगाने आजचा आणि उद्याचा संप आज स्थगित करण्यात आला.
    
तदवतचं राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेची चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दु.12.00 वाजता सभा घेण्यात आली त्यात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष दिपक जेऊरकर व कार्याध्यक्ष राजु धांडे यांनी सभेला मार्गदर्शन करताना प्रलंबित मागण्यासंदर्भात राज्य सरकारने दिलेल्या सकारात्मक आश्वासनाबाबत चर्चा करण्यात आली. या संपामध्ये स्थगितीचा निर्णय झाल्याप्रमाणे येत्या दोन महिन्यांमध्ये म्हणजेच माहे एप्रिल पर्यंत राज्य सरकारने जुन्या पेन्शन इतर सर्व मागण्यांबाबत जो शब्द दिला.त्या शब्दावर निर्णय घेतला नाही तर 17 लाख कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करणारी ही समन्वय समिती मे २०२२ पासून बेमुदत संपावर जाईल असे सांगण्यात आले.

या सभेचे संचालन शैलेश धात्रक यांनी केले तर उपस्थितीतांचे आभार अनंत गहुकर यांनी मानले.
आयाेजित सभेला राजेश पिंपळकर, राजेश लक्कावार, सिमा पॉल, रजनी आनंदे, सतीश असरेट, प्रशांत कोशटवार, अविनाश बोरगमवार, समर्थ, मानकर, अतुल भिसे, प्रितम शुक्ला, अतुल किनेकर, लीना जांभुळकर, चंदू ठाकरे, श्रीकांत येवले, संजय बिस्वास, नितीन पाटील, एस.आर. माणुसमारे, अनंत गहुकर, महेश पानसे, अशोक वैद्य, राज्याध्यक्ष मुख्याध्यापक सेवा मंडळ, उमाजी कोडपे, जिल्हा सचिव प्राथमिक शिक्षक समिती तसेच संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.